“आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, कुणीही…”


राज ठाकरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र, दिला ‘हा’ इशारा!

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून ४ मे रोजी मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन सुरू करण्यापूर्वीच पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून काही ठिकाणी कारवाई केली होती. यासंदर्भात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र लिहिलं आहे. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून हे पत्र ट्वीट केलं आहे. या पत्रामध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर इशारा देखील दिला आहे.


“सरकारला माझं एकच सांगणं आहे…”

हे पत्र ट्वीट करताना राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना इशाराच दिला आहे. “राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

“मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. हजारोंना तडीपार केलं. अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!” असं या पत्रात राज ठाकरे म्हणाले आहेत.

“मला प्रश्न पडलाय की…”

“गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे, ते पाहाता मला प्रश्न पडलाय की मशिदींमध्ये ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलीस असे शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत”, असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे.


“मनसे कार्यकर्त्यांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत, हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत”, असं देखील या पत्रात राज ठाकरेंनी नमूद केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या