प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

ढोरजळगांव – ग्रामीण भागातील शेतक-यांची कामधेनू म्हणून ओळखला जाणारा दूग्ध व्यवसाय दुधाला दर कमी झाल्याने अडचणीत सापडला आहे.
शेतीला जोडधंडा म्हणून शेतकरी दूग्ध व्यवसायावर भर देतो. दैनंदिन या व्यवसायातून गरजा भागविण्याचे प्रमुख साधन म्हणून ओळखले जाते. मागील काही महिन्यात दुधाचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने पेंड वालीस व चा-याचा खर्च निघणे दुरापात्र झाले आहे. दुग्ध व्यवसायाची राबराब तर सोडाच कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर मोठा फटका दुग्ध व्यवसायाला बसला असून गायीचे खरेदी विक्री बाजार बंद आसल्याने किंमतीतही मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
गायीच्या दुधाला पूर्वी ३२ रूपये भाव मिळत असल्याने खर्च परवडणारा होता. मात्र, गेल्या दोन महिन्यात दुधाचे दर २० रूपयांवर आल्याने पेंडीचा खर्च सुद्धा निघत नसून आजही दुधापासून तयार होणा-या पावडरचे दर जैसे थे असताना दुग्ध व्यावसायिकांना का योग्य दर दिला जात नाहीये, असा प्रश्न विचारला जात आहे. दुग्ध व्यावसायिकांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी दुधाला पूर्वीप्रमाणे योग्य दर देण्यात यावा, अशी मागणी दूग्ध व्यावसायिकांमधून होत आहे.
महादेव पाटेकर (डेअरी चालक)
दूग्ध उत्पादक शेतकरी कोरोनामुळे मोठ्या अडचणीत सापडला असून दुधाचे भाव गडगडले असून पेंड वालीसचा खर्च सुद्धा निघणे मुश्कील बनले असून भविष्यात पशूधन व दुग्ध व्यवसायाला बळकटी आणण्यासाठी योग्य दर शासनाच्या वतीने देण्याची भूमिका घेतली तरच दूग्धव्यवसाय व दूग्धव्यवसायिक टिकू शकेल यासाठी शासनाने योग्य ती भूमिका घेऊन दूध दर वाढ करण्याची भूमिका घ्यावी योग्य ती भाव वाढ करावी.