निवडणुकीलाही अधिका-यांनाच उभे करा

नगर: ‘केंद्र सरकारकडून आलेला कोरोनाचा निधी खर्च करीत असताना प्रशासनाकडून एकदाही खासदाराला विश्वासात घेतले जात नाही, ही शोकांतिका आहे. कोरोना निधीबाबत खासदारालाच सूचना करण्याचा अधिकार नसेल, तर आम्ही राजीनामाच देऊन टाकतो,’ असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला. ‘येथून पुढे निवडणुकीलासुद्धा जिल्हाधिकारी, प्रातांधिकारी, तहसीलदार यांनाच उभे करावे,’ असे ते संतापाने म्हणाले.
विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाइन नागरी संवादात विखे बोलत होते. ते म्हणाले, की कोराना निधी म्हणून नगर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून अठरा कोटी रुपये आले. या निधीचा खर्च कसा झाला पाहिजे, हेदेखील सांगण्यात आले होते; पण केंद्राकडून आलेल्या या निधीचा खर्च करीत असताना एकदाही खासदाराला विश्वासात घेतले जात नाही. चार ऑगस्टला आमची आरोग्य कमिटीची मिटींग असून त्यामध्ये मी हा मुद्दा मांडणार आहे. कोरोना निधी केंद्र सरकारचा आहे आणि त्यात खासदाराला सूचना करण्याचा अधिकार नसेल तर आम्ही राजीनामा देऊन टाकतो. आम्ही कशाला निवडून आलो ? आमच्या कुटुंबाने कशाला पन्नास वर्षे या जिल्ह्यातील राजकारणात जनतेसाठी घातली ? मी कशाला तीन-चार वर्षे मेहनत घेऊन निवडणूक लढवली ? असे सवाल त्यांनी केले.
मी निवडणूक जिंकून खुर्चीवर बसलो आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा देऊन खुर्चीवर बसलो नाही,’ असा टोला त्यांनी अधिकाऱ्यांना लगावला. ‘आमच्या सारख्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जर स्वतःचे म्हणणे मांडण्याचा अधिकार नसेल, आम्ही मांडलेल्या मुद्द्यांना ग्राह धरले जात नसेल, तर आम्ही लोकप्रतिनिधी होऊन करणार काय ? असा सवालही त्यांनी केला. जर प्रशासनाला त्यांच्या पद्धतीने कारभार चालवायचा आहे. जिल्हाधिका-यांना ते म्हणतील तेच होईल, असे वाटत असेल आणि तालुकास्तरावर तहसीलदार, प्रातांधिकारी म्हणतील तेच होईल, तर ठीक आहे, आम्ही येथून पुढे निवडणूकच लढवणार नाही. आम्ही पुढच्या वेळी म्हणू यांनाच निवडणुकीला उभे करा, आणि यांनाच निवडून आणा, कारण हेच सर्व चालवत आहेत,’ अशी खोचक टीका त्यांनी प्रशासनावर केली.
किमान विरोधात तरी भूमिका घ्या
टाळेबंदी करण्याबाबत मी मांडलेल्या भूमिकेचे जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींना समर्थन करता येत नसेल, तर निदान त्यांनी विरोधात तरी बोलावे; पण त्यांनी आपली भूमिका मांडावी, असे आवाहन खा. विखे यांनी केले. कोरोना हा सोपा आजार आहे, असे समजू नका. आपल्याला ९९ टक्के धोका नाही; पण एक टक्का धोका आहे, हे लक्षात ठेवा,’ असेही विखे यांनी सांगितले.
रात्रीच्या संचारबंदीचे लाॅजिक काय?
नगरमध्ये दिवसा गर्दी होते आणि येथे रात्रीची संचारबंदी आहे. या रात्रीच्या संचारबंदीमागचे लाॅजिक मला समजले नाही,’ अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले.