गुरुवारी बाधित सापडलेल्या नायकवाडपुरा भागातील महिलेचा मृत्यू
प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री

संगमनेरमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. आजही रात्री उशिरा शहरातील नायकवाडपुरा भागातील 50 वर्षीय संक्रमित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी येऊन धडकली. या महिलेवर नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. तेथे उपचारा दरम्यानच काळाने तिच्यावर घाव घातला. या महिलेचा मृत्यूमुळे कोरोना बळींची संख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. या वृत्ताने संगमनेर मध्ये खळबळ उडाली आहे.
शहरात गुरुवारी (ता. 25) ला मोमिनपुरा परिसरातील 46 वर्षीय व्यक्तीसह नायकवाडपुरा भागातील एका 50 वर्षीय महिलेला कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले होते. यातील 50 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सदर महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना कृत्रिम प्राणवायूवर ठेवण्यात आले होते. मात्र काल रात्री त्यांची प्रकृती कमालीची ढासळल्याने जिल्हा रुग्णालयातील आरोग्य दूतांनी केलेल्या प्रयत्नांना अपयश आले आणि आज त्या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्युने एकाच आठवड्यात संगमनेर शहरातील दोन महिलांचे बळी गेले असून कोरोनामुळे शहरातील 6 व तालुक्यातील 5 बळी गेले आहेत एकूण बळीची संख्या 11 वर पोहोचली आहे.
संगमनेर तालुक्यात सुरु झालेला कोरोनाचे चक्र काही केल्या थांबण्याचं नाव घेईना. एका पाठोपाठ रुग्ण सापडण्याबरोबरच कोरोनाचे संक्रमण होऊन मृत्यू होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून प्रशासन ही गोंधळलेले दिसत आहे.