प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
रायगडावरील ऐतिहासिक हत्ती तलाव तब्बल 150 वर्षांनी संपूर्ण क्षमतेने भरला आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. गेल्या कित्येक वर्षात आम्ही इतक्या प्रचंड प्रमाणात हा तलाव भरल्याचे पाहिले नव्हते, असेही स्थानिकांनी सांगितले आहे.
रायगडावरील हत्ती तलाव ही एक महत्वाची ऐतिहासिक वास्तू देखील आहे. तिचे जतन करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. ‘रायगड विकास प्राधिकरण’ या छत्रपती संभाजीराजेंच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या संस्थेमार्फत याचे रायगडाचे संवर्धन आणि जतन सुरू आहे. हा तलाव संपूर्ण भरल्यामुळे छत्रपती संभाजी राजे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
“असे क्षण जीवनात खूप कमी येतात! ज्याचं समाधान आयुष्यभर लाभतं. सर्व शिवभक्तांना सांगताना आनंद होत आहे, की रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून आपण जे काही काम हाती घेतले, त्याला यश येत आहे. हत्ती तलावाचे 80% काम पूर्ण झाले असून तलावाला अजूनही एक जागेत गळती आहे. त्या गळतीचा व्यवस्थित अभ्यास करुन ती सुद्धा काढून घेतली जाईल”, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.