प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. सुरूवातीला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. परंतु, तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. लॉकडाऊन करताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी फिरणाऱ्यांसह मास्क न वापरणाऱ्यांवर कायदेशीर निर्बंध घातले होते. जिल्हाधिकार्यांनी पोलिसांना दिलेल्या निर्देशानुसार कायदा मोडणाऱ्या अश्या श्रीगोंदयातील १३८ जनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये कलम १८८ प्रमाणे दाखल केलेले गुन्हे आहेत. या दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीला १ महिना तुरुंगवास अथवा दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असेल तर सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे १८८ अंतर्गत गुन्हे दाखल झालेल्यांची डोकेदुखी वाढलेली आहे.
परवानगी नसताना संचार करणे, मास्क न लावणे, विनापरवाना वाहतूक करणे, परवानगी नसताना दुकाने सुरू ठेवणे, अशा विविध कारणांवरून हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मोठ्या संख्येने गुन्हे दाखल करण्यात आल्याने, पोलिसांसमोर आता या गुन्ह्याचे आरोपपत्र (चार्जशीट) तयार करून न्यायालयात वेळेवर सादर करण्याचेही आव्हान उभे ठाकले आहे. तर नियम मोडणारांना या गुन्ह्यांमुळे चांगलीच अद्दल घडणार आहे.