बेळगाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हटविल्या प्रकरणी वेळ पडल्यास महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू, पण ते तयार आहेत का, असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगावातून रात्रीच्या अंधारात पोलिसांनी ज्या पद्धतीने हटवला, त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी. त्याविषयी विरोधीपक्ष बोलायला तयार नाही. चार दिवसांपूर्वी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये रात्रीच्या वेळी, दिवे बंद करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जातो, हे कसले लक्षण?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी. राजकारण न करता या राज्यातल्या विरोधीपक्षाच्या प्रमुखांना म्हणजेच विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करायला तयार आहोत. ते यायला तयार आहेत का विचारा” असेही राऊत म्हणाले.