जमीनी बळकावल्या प्रकरणी सावकाराविरुद्ध गुन्हा!


नगर

सामान्य माणसाच्या गरजेचा गैरफायदा घेऊन व्याजाने दिलेल्या पैशाच्या बदल्यात सावकाराने लाखो रुपयांची जमीन बळकावल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 'काहीही झाले तरी शेतकऱ्यांनी व्याजाच्या रकमेपोटी आपल्या जमिनी खाजगी सावकारांच्या नावावर लिहून देऊ नये' असे आवाहन पोलिस निरीक्षक यादव यांच्या वतीने अनेकवेळा आवाहन करण्यात आले. आता सावकारांचे अनेक कारनामे उघड होऊ लागले आहेत.

कर्जत तालुक्यातील रातंजन भिसे वस्ती येथील एक तक्रारदार (वय ५६) यांनी आपले ओळखीचे नातेवाईक असलेल्या दत्तात्रय कोरडे (रा.मिरजगाव) यांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी खाजगी सावकार सुखदेव दिनकर केदारी हा व्याजाचा व्यवसाय करत असुन तो तुम्हाला पैसे देईल, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी मध्यस्ती असलेल्या कोरडे व आपल्या कुटुंबियांसह घरी जाऊन २ लाख रुपये पाच टक्के व्याजदराने घेतले. २०१५ साली घेतलेल्या २ लाखांच्या रकमेवर सलग २ ते ३ महिने प्रतिमाहिना १० हजार व्याज सावकाराला दिले. मात्र त्यानंतर प्रतिमहिना व्याज देणे तक्रारदारास जमले नसल्याने सावकाराने पैशांसाठी तगादा लावत घरी येऊन शिवीगाळ केली. 'पैसे दे नाहीतर जमीन नावावर करून दे' अशी दमदाटी केली. तक्रारदार भिसे यांची रातंजन शिवारात असलेली गट नं.४२/१/३ मधील ५० आर जमीन सावकाराने आपला मुलगा गणेश याच्या नावे कर्जत सबरजिस्टर येथे जाऊन 5 जाने. २०१६ रोजी धमकावून जबरदस्तीने नावावर करून घेतली. सावकार केदारी याच्याकडून घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतर केलेली खरेदी पुन्हा पलटून देण्याचे ठरले होते. त्यानंतर सुखदेव केदारी, गणेश केदारी, अशोक केदारी हे तिघे २६ मार्च २०१६ रोजी तक्रारदार भिसे यांच्या घरी येऊन 'व्याज व मुद्दलाचे पैसे द्या नाहीतर आम्ही तुमची जमीन दुसऱ्याला विकणार आहोत' असे म्हणत कुटुंबातील सर्वांना शिवीगाळ, दमदाटी केली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांचा मुलगा यशवंत भिसे याने दि.२७ मार्च २०१६ रोजी विषारी औषध सेवन केले. नगरच्या सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये सहा ते सात दिवस उपचार घेतल्यानंतर त्याचे प्राण वाचले. सावकार केदारी हा आज ना उद्या माझी जमीन मला परत देईन, या आशेवर मी तक्रार दिली नाही. परंतु केदारी हा जमीन दुसऱ्या कुणालातरी विकणार आहे, अशी माहिती समजल्यावर तक्रारदाराने जमीन विकू नये, अशी विनंती केली असता सावकाराने घरात घुसून मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर तक्रारदाराने अवैध सावकारीतुन बळकावलेली जमीन परत मिळण्यासाठी वकिलामार्फत नोटीस पाठवली होती व वृत्तपत्रात त्याबाबत प्रसिद्धीही दिली होती.

सदरच्या जमिनीवर तक्रारदाराचा ताबा असुन त्यात नांगरट करून दहा महिन्यांपुर्वी ऊस लावण्यात आला आहे. दि.२२ जुन २०१६ रोजी नगरच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सावकार सुखदेव केदारी व त्याचा मुलगा गणेश केदारी यांनी माझी जमीन बळकावलेबाबतचा अर्ज दाखल केला. दि.११ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वा. सावकार सुखदेव केदारी, गणेश केदारी, अशोक केदारी हे तिघे घरी येऊन 'तु कर्जत पोलिस ठाण्यात आमच्या विरोधात गुन्हा दाखल करू नको, असे म्हणत तक्रारदारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या