तालुक्यात विकासकामे केल्याने मला शांत झोप लागते - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे


इंदापूर  प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यात विकास कामे केल्यामुळे मला शांत झोप लागते असे म्हणत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाव न घेता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टोमणा मारला आहे. इंदापूरमध्ये ॲड.राहुल मखरे व परिवाराने आयोजित केलेल्या मौर्य एंपायर कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन समारंभ शनिवारी ( दि.१७ ) बामसेफचे वामन मेश्राम व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते संपन्न झाला या कार्यक्रमात ते बोलत होते.

सोमवारी ( दि.११) मावळ तालुक्यातील सोमाटणे टोलनाका येथे हॉटेल राजवर्धन वाडा उद्घाटनप्रसंगी सर्वपक्षीय नेते एकत्र आल्यानंतर राजकीय नेत्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या मुद्द्यावर हर्षवर्धन पाटील यांनी मिश्कीलपणे टोला लगावला होता. तद्नंतर या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत खुलासा केला.त्यावर शनिवारी (दि.१६) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याच मुद्याला हात घालत हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता चिमटा काढला.

यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, काही लोक काम न करता खूप वाजवतात परंतु आपल्या तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून १ हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली.आपल्याला खूप कामे करायची आहेत. अजूनही खूप कामे झाली असती परंतू कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या. असे असले तरी विकासाच्या बाबतीत इंदापूर, बारामती व नांदेडमध्ये खीळ बसली नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या