सरकार पाडणार नसल्याची विरोधकांना जाणीव : नवाब मलिक


पुणे :
आम्ही राज्यसरकार पाडणार नाही तर हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता मांडत आहेत त्यामुळे मविआ सरकार पडणार नाही हे सत्य ते आता स्वीकारत आहेत असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री  नवाब मलिक यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या प्रचार आणि प्रसिद्धीबाबत चर्चा सुरु आहे. मात्र सरकारची 'बाते कम, काम जादा' अशी भूमिका असल्याचे  मलिक यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री  नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसरकारच्या कामकाजाचा आढावा माध्यमांसमोर मांडला.
सरकार सत्तेत आल्यावर सर्वप्रथम मागील सरकारच्या काळात प्रलंबित शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करून राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला. सरकार सत्तेत आल्यानंतर दुर्दैवाने तीन महिन्यातच देशात कोरोनाचे संकट आले. मात्र यात देशभरात जी दुर्दैवी परिस्थिती आपण पाहिली तशी परिस्थिती राज्यसरकारने राज्यात निर्माण होऊ दिली नाही. यासाठी कोविड सेंटर्स, टेस्टींगमध्ये वाढ, ऑक्सिजनसाठा अशा सर्व गोष्टींचा पुरवठा राज्यसरकारने वेळोवेळी केल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
गुजरात राज्यात रुग्णसंख्या लपवण्यात आली. उत्तरप्रदेशमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध होत नसल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात आले, याकडेही नवाब मलिक यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
महाविकास आघाडी सरकारने विकासाची कामे कोविडमध्ये थांबवली, मात्र कोणतेही प्रकल्प रद्द केले नाहीत. शिवाय विविध धोरणांवरही भर देण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
राज्यात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून कौशल्य विद्यापीठ सुरु करण्यात आले आहे. बेरोजगारी ही मोठी समस्या असल्याने राज्यसरकारने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून बेरोजगारांचा फायदा करुन देण्याचा विचार केला आहे. ही नवीन योजना राज्यात बेरोजगारी संपविण्यासाठी राबविण्यात येईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे भाजपचे नेते सांगत होते. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आता आम्ही राज्यसरकार पाडणार नाही तर हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ अशी भूमिका मांडत आहेत त्यामुळे मविआ सरकार पडणार नाही हे ते आता स्वीकारत आहेत असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
२०२४ साली हे सरकार पुन्हा राज्यात सत्तेत येईल. मुख्यमंत्री महोदयांना विश्वास आहे की हे सरकार केवळ पाच वर्षांसाठी नाही तर २५ वर्षांसाठी एकत्र आले आहे असे सांगत नवाब मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारमधील एकजुटीची भावना माध्यमांपुढे मांडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या