शिवसेना दिल्ली काबीज करणार

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद

... तेव्हाच युती सोडली असती तर आज पंतप्रधान शिवसेनेचा असता

मुंबई : शिवसेना आता महाराष्ट्राबाहेर सर्वत्र निवडणुका लढविणार असून बाळासाहेबांचे दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न येत्या काळात पूर्ण करणार, असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. हिंदुत्वासाठी सत्ता हवी होती. वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही भाजपला सोडलं, बाबरी मशीद पडल्यानंतर देशात शिवसेनेची लाट होती. बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता, अशा शब्दात त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "फेब्रुवारीत भेटलो होतो. त्यावेळी आपण राज्यभर शिवसंपर्क मोहिम राबवायचं ठरवलं होतं. पण कोरोनाची दुसरी लाट आली. आतासुद्धा दिवाळीच्या सुमारास राज्यभर फिरायचं, सगळ्यांचं दर्शन घ्यायचा विचार करत होतो पण थोडं माझं मानेचं दुखणं उपटलं. माझी शस्त्रक्रिया करावी लागली. कोरोनाच्या लाटेमागून लाटा येऊ शकतात. आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाही? व्हायरस त्याची लाट एकामागे एक आणत असेल तर आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाहीत? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, एकट्यानं लढा म्हणायचं आणि सत्तेचा गैरवापर करायचा. हरलो तरी घरी घाबरायचं नाही, बघू किती दिव हरणार. पण आता लढणार. महाराष्ट्राबाहेर देखील आपण निवडणूक लढवायची.राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेच्याही बड्या नेत्यांनी प्रचारात उतरावं. सत्तेचा कसा वापर अधिक कसा करता येईल, याचा विचार करा आणि काम करा. हातात बळ नसेल, तर एकहाती सत्ता शक्य नाही. वाघ असाल तर बंगालच्या वाघिणीसारखं लढायला शिका. सत्तेचा वापर अधिक कसा करता येईल याचा विचार करा आणि काम करा, असंही ठाकरे म्हणाले.

"शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी लावलेल्या वृक्षाचे फळं आपण चाखत आहोत. आज आपण प्रत्यक्ष भेटत नसलो तरी तंत्रज्ञानामुळे भेटतच आहोत. आपल्याला कुणी अडवू शकत नाही. आज मी तुमच्यासमोर खूप दिवसांनी आलेलो आहे. मधले दोन महिने उपाचारात गेलो. मी लवकरात लवकर बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. तुमच्यासोबत तुमच्या साक्षीने भगव्याचं तेज आहे, जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं तसं काळजीवाहू हे विरोधक आहेत. स्वत:च स्वत:च्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे", असे  त्यांनी म्हटले आहे.
--------------

25 वर्ष युती सडली

"शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली युती 25 वर्ष सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाण आहे. बाळासाहेब म्हणायचे की राजकारण हे गजकर्णसारखं आहे, जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येते. तसे हे सगळे राजकारणातले गजकर्णी..!
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या