नामर्दासारखे कार्टून दाखवू नका म्हणणाऱ्या पूनम महाजनांना संजय राऊतांनी दिलं उत्तर


संजय राऊत यांनी भाजपाला उत्तर देताना व्यंगचित्र केलं ट्विट, नंतर मात्र डिलीट

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी रविवारी संवाद साधल्यानंतर भाजपा नेत्यांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. हिंदुत्वावरुन सध्या शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. संजय राऊत यांनी भाजपाला उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. यावरुन भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिलं होतं. यावर आता संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी काय ट्विट केलं होतं?

संजय राऊत यांनी “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट” अशी कॅप्शन देत एक कार्टून शेअर केलं होतं. या कार्टूनमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर बसल्याचं दिसून येत होतं. यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे पाय समोरील खुर्चीवर असून समोर उभ्या प्रमोद महाजन यांना ‘हॅव अ सीट’ असं म्हणत आहेत. यावेळी खुर्चीच्या बाजूला एक छोटा स्टूल देखील होता. नंतर हे ट्वीट संजय राऊत यांनी डिलीट केलं.


पूनन महाजन यांची टीका –

भाजपा नेत्या पूनम महाजन यांनी संजय राऊतांच्या ट्वीटचा फोटो शेअर करत “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका,” असं सुनावलं होतं.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया –

“ते कार्टून काय मी काढलं आहे का?…ते ट्वीट हटवलं नाही, जिथे पोहोचवायचं तिथपर्यंत ते पोहोचवलं आहे. प्रमोद महाजन हे त्या चित्रात बाळासाहेबांसमोर उभे आहेत. भाजपाच्या युतीचा तो सुरुवातीचा काळ होता. काल महाऱाष्ट्रातील भाजपा नेत्यांनी शिवसेनेसंबंधी जी वक्तव्यं केली, त्यात सत्य काय होतं हे दाखवण्यासाठी हे कार्टून शेअर केलं. आर के लक्ष्मण एक तटस्थ व्यंगचित्रकार होते. टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध केलेलं ते व्यंगचित्र होतं. त्यात इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नव्हतं. मी काही प्रमोद महाजन यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली नाही. तसं असतं तर त्यांनी त्यावेळीच ३५-४० वर्षांपूर्वी आक्षेप घ्यायला हवा होता. हे कार्टून उपलब्ध आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, मनोहर पर्रीकर या तिन्ही कुटुंबांचं भाजपाच्या वाढीत फार मोठं योगदान आहे. पण त्यांची पुढील पिढी आता कुठे आहे? त्यांचं भाजपाशी काय नातं आहे हे पहावं लागेल”. पूनम महाजन सध्या कुठे आहेत माहिती नाही. त्यामुळे त्यांनाही मला सध्या त्या कुठे आहेत असं विचारायचं आहे असं राऊत म्हणाले. पण माझे आणि महाजन कुटुंबाचे चांगले संबंध आहेत असंही ते म्हणाले.

हिंदुत्वाच्या टीकेवरुन उत्तर –

“विले पार्लेच्या पोटनिवडणुकीत देशात पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी प्रचार केला होता. काँग्रेस आणि भाजपा विरोधात असतानाही आम्ही ही पोटनिवडणूक जिंकलो होतो. यानंतर सर्वांना झटका बसला होता. हिंदुत्वाचा मुद्दा लोकांना भिडला असून देशात हिंदुत्व वाढेल आणि त्यावर निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास निर्माण झाला. त्यानंतर भाजपाचे मोठे नेते बाळासाहेबांकडे आले आणि एकत्र निवडणूक लढू असं सांगितलं. मन मोठं असल्याने आणि हिदुत्वाच्या मतांचं विभाजन होऊ नये यासाठी बाळासाहेबांनी मान्य केलं. पण त्यावेळी अडवाणी, प्रमोद महाजन, अडवाणी असे मोठे नेते होते,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची भूमिका त्यावेळी फार महत्वाची होती. भाजपाचे जे आजचे नवहिंदुत्ववादी नेते आहेत त्यांच्या इतिहासाची काही पानं फाडण्यात आली आहेत त्यामुळे त्यांना माहिती नाही. पण त्यांना हवं असेल तेव्हा वेळोवेळी माहिती देत राहू,” असंही संजय राऊत म्हणाले. 

“दिल्ली काबीज करण्यासंबंधी बाळासाहेब थोरात यांनी केलेलं वक्तव्य योग्य आहे. दिल्ली काबीज करणं म्हणजे सर्वांना एका नेतृत्वाखाली एकत्र घेऊन भाजपाचं सरकार हटवणं. आज दिल्ली एक दोन व्यक्तींच्या हातात आहे. दिल्ली देशाची असून देशाचं वर्चस्व हवं. एखाद्या राजकीय पक्षाची किंवा व्यक्तीची नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या