“भाजपाला गोव्यात ४० पैकी ४२ जागा मिळतील”


पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये गोव्याशी भावनिक नातं असल्याचं सांगितलं होतं, त्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया.

गोवा : गोवा भाजपावर साधला निशाणा ) शिवसेनेनं गोव्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढण्याचं ठरवलं असून निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे गोव्याचा दौरा करणार आहेत. आदित्य ठाकरे हे भाजपाचे गोव्यातील मुख्यमंत्री असणाऱ्या प्रमोद सावंत यांच्या वास्को या मतदारसंघामध्ये सभा घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय. पेडणे इथे आदित्य काही राजकीय भेटीगाठी घेणार आहेत. मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघात उद्या सभा आहे, असा गोव्यात प्रचार आणि विस्तार शिवसेनेचा सुरु आहे, विधानसभा निवडणुक झाल्यावर लोकसभा निवडणुकीची तयारी करणार असल्याचंही यावेळी राऊत म्हणालेत.

 भविष्यात आम्ही गोव्यामधील लोकसभेच्या दोन्ही जागा आम्ही लढवणार आहोत, असं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. यावेळी राऊत यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा २२ जागा जिंकेल या दाव्यासंदर्भातही भाष्य केलं.

साधा मुख्यमंत्री गेला तरी… मोदींच्या सभेनंतर गोव्यामध्ये भाजपावर मतदरांचा आत्मविश्वास वाढल्याचं फडणवीस सांगतायत असं राऊत यांना सांगत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये २० सभा झालेल्या, केरळमध्येही झाल्या होत्या. पंजाबमध्येही त्यांच्या सभा सुरु आहेत. पंतप्रधान येतात तेव्हा त्यांच्यासोबत मोठा लवाजमा असतो. त्यांच्याकडून लोकांना फार अपेक्षा असतात. साधा मुख्यमंत्री गेला तरी लोकांच्या अपेक्षा असतात हे तर पंतप्रधान आहेत,” असं राऊत म्हणाले. कुठे होते गोव्याच्या लढ्यात?

‘गोल्डन गोवा’ हा नारा देताना काँग्रेसने गोव्याला १४ वर्ष वनवासात नेलं, अशी टीका पंतप्रधानांनी केल्याचा संदर्भ देत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, “गोवा गोल्डनच आहे,” असं म्हटलं. “या गोल्डन गोव्यात तुम्ही नंतर आला. गोवा स्वतंत्र झाला, इंदिरा गांधींनी त्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला. नेहरुंनी येथे मोठं काम केलंय. आज बोलणारे लोक कुठे होते गोव्याच्या लढ्यात?” असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय. पुढे बोलताना, गोव्याच्या लढ्यात महाराष्ट्र होता, राममोहन लोहिया होते. गोवा मुक्तीसाठी लढणाऱ्या इतर लोकांनी मिळून गोवा स्वतंत्र्य केलाय, असंही राऊत म्हणाले.

गोव्यावर एका पक्षाचा हक्क नाही…

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये गोव्याशी भावनिक नातं असल्याचं सांगितलं होतं. पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून गोव्यातील भाजपाच्या बैठकीमध्येच मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली होती. त्यावरुन छेडलं असता राऊत यांनी, “अख्ख्या देशाला गोवा भरभरुन देतो. गोव्याने बाळासाहेबांना, लोहियांना भरभरुन दिलं आहे. गोव्यावर एका राजकीय पक्षाचा हक्क कधीच राहिला नाही,” असं राऊत म्हणाले.

चीनचं नावही घेत नाही…

“आज आमच्या समोर सर्वात मोठी चिंता लडाखमधील आहे. तुम्ही लडाखला कधी स्वतंत्र करताय ते सांगा. गोवा स्वतंत्र होऊन जमाना लोटला. तुम्ही चिनी सैनिकांना कसं बाहेर काणमार सांगा. तुम्ही साध चीनचं नाव घ्यायला तयार नाहीत,” असा टोलाही राऊत यांनी पंतप्रधानांच्या भाषणाचा संदर्भ देत लगावलाय.

काँग्रेसचे आमदार फोडता आले म्हणून राज्य करताय

गोव्यात प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न वेगवेगळेत. त्यामुळे वेगवेगळे जाहीनाम्यांची घोषणा केली जातेय, असंही राऊत म्हणाले. शिवसेनेचा जाहीरनामा उद्या जाहीर होणार असून तो आदित्य ठाकरेंच्या उपस्थित होईल अशी माहिती राऊत यांनी दिली. “काँग्रेस इथला मूळ पक्ष आहे. काँग्रेस इथला राज्यकर्ता पक्ष आहे.काँग्रेसचे आमदार फोडता आले म्हणून राज्य करताय,” असा टोलाही राऊत यांनी भाजपाला लगावला.

मग आम्ही आलो तर प्रश्नचिन्ह का?

“प्रधानमंत्री, गृहमंत्री सरकारची कामं असतानाही येतात. प्रधानमंत्र्यांनी येण्याची गरज नव्हती त्यांना दिल्लीत बसूनही करता आलं असतं. मग आम्ही आलो तर प्रश्नचिन्ह का?”, असा प्रति प्रश्न राऊत यांनी राहुल गांधींच्या आजच्या गोवा दौऱ्यावरील प्रश्नावर उत्तर देताना विचारला. तसेच गोव्यात आम्ही निवडून आलो तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी पॅटर्न राबवणार असल्याचे संकेत राऊत यांनी दिलेत.


भाजपाच्या पोटातील कळ…

प्रयत्नांची पराकाष्टा करुन महाविकास आघाडीला तडा जात नाही त्यामुळे भाजपाच्या पोटात कळ येत असल्याचा टोला राऊत यांनी लगावलाय. “महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती आहे,” असंही राऊत म्हणालेत. आदित्य ठाकरे आणि अजित पवार आज मुंबईमधील पहाणी दौऱ्यात एकत्र गेल्याचा संदर्भ देत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

महाराष्ट्र झुकणार नाही…

ट्विटमधील जय महाराष्ट्र, महाराष्ट्र कधी झुकणार नाही यावर प्रश्न विचारण्यात आला असता, “महाराष्ट्र झुकणार नाही, महाराष्ट्राला वाकवण्याचा, खच्च करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र महाराष्ट्राचा इतिहास जुंजार, लढण्याचा, छाताडावर पाय ठेऊन उभा राहू,” असं राऊत म्हणाले.

फडणवीसांच्या दाव्यावरुन टोला

“ते एका पक्षाचे नेते आहेत. त्यांनी असं आत्मविश्वपूर्ण बोलणं गरजेचं आहे. ११ पैकी ११ जिंकू असं आम्हीही म्हणतो. काँग्रेस म्हणतंय आम्ही जिंकू, इतर पक्षही जिंकण्याचा दावा करतायत,” असं राऊत फडणवीसांच्या वक्तव्यावर उत्तर देताना म्हणाले. तसेच पुढे टोला लगावाताना भाजपाला गोव्यामध्ये ४० पैकी ४२ जागा मिळतील, असंही राऊत म्हणाले.

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर म्हणाले…

“माझी संपत्ती त्यांनी काय असेल ती घेऊन टाकावी,” असं किरीट सोमय्या आणि भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या संपत्तीसंदर्भातील आरोपांवरील प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले. “तुमच्या संपत्त्या काय आहेत ते बघा. मी मराठी माणूस आहे, माझी महाराष्ट्रातच संपत्ती असायला हवी. पण ती नाहीय. मराठी माणसाच्या हातात पैसे खेळू नये यासाठी षडयंत्र आहे,” असं राऊत म्हणाले.

मी उत्तर दिलं की…

“मी एखाद्यावर उत्तर दिलं की तो माणूस मोठा होतो,” असं म्हणत राऊत यांनी पत्रकांनी भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या आरोपांवरील प्रश्नावर उत्तर देणं टाळत पत्रकार परिषद संपवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या