राहुल बजाज यांना अखेरचा निरोप; वैकुंठ स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


पुणे :
सामाजिक जाणिवेचे दानशूर उद्योगपती आणि बजाज उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा राहुलकुमार बजाज यांना रविवारी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये बजाज यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा आपला भाग्यविधाता आता भेटणार नाही या जाणिवेतून कामगारांच्या डोळय़ांतून नकळतपणे अश्रू झरले. बजाज यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी त्यांचे निधन झाले. आकुर्डी येथील बजाज ऑटो कंपनीच्या प्रांगणात असलेल्या निवासस्थानी रविवारी सकाळी बजाज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठितांसह राजकीय नेते आणि बजाज ऑटोमध्ये काम करणाऱ्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दुपारनंतर त्यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमी येथे आणण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राहुलकुमार बजाज यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून बजाज यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बजाज यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज राजीव बजाज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. बजाज यांचे पुत्र राजीव व संजीव बजाज, कन्या, सुनयना केजरीवाल यांच्यासह बजाज परिवारातील सदस्यांनी अंत्यदर्शन घेतले. योगगुरू बाबा रामदेव, ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,  कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांच्यासह बजाज ऑटो कंपनीमधील कर्मचारी उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योगपती राहुलकुमार बजाज म्हणजे एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व. जमनालाल बजाज यांच्यामुळे त्यांना गांधीवादी विचारसरणी आणि आध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभला होता. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण मते ते परखडपणे मांडत असत. स्वदेशीचा पुरस्कार करणारे बजाज सेवाधर्माचे अग्रणी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या