चारीमुंड्या चीत केल्याशिवाय नाव लावणार नाही ?


 म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना खडसेंनी दिलं उत्तर; म्हणाले “तुमच्या नावाची…”

जळगाव जिल्ह्याचे राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या निमित्ताने सध्या राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत. तिन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. नुकतंच एकनाथ खडसे यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर तोफ डागली, गुलाबराव तुमच्या नावाची सुरुवातच खराब आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

गुलाबराव पाटलांचं एकनाथ खडसेंना जाहीर आव्हान; म्हणाले “चारीमुंड्या चीत करून हा पाटील नावाचा नाही निघाला तर…”

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एकनाथ खडसेंनी मेळाव्याला संबोधित करताना म्हटलं की, “गुलाबराव तुमच्या नावाची सुरूवातच घाण आहे, नाथाभाऊला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत. परंतु नाथाभाऊ हरणार नाही. बोदवडमध्ये भाजपासोबत छुपी युती करून सत्ता काबीज केली. पण आता तसे होणार नाही”.

“गुलाबराव पाटील यांनी नाथाभाऊला चारीमुंड्या चीत केल्याशिवाय नाव लावणार नाही असं म्हटलं आहे. मी त्यांना सांगितलं, गुलाबराव तुम्ही तुमचं नाव लावूच नका, कारण तुमच्या नावाची सुरुवातच खराब आहे,” असं एकनाथ खडसे म्हणाले. जो शक्तिमान असतो त्याच्याविरोधातच सगळे एकत्र येतात कारण ते त्याला हरवू शकत नाहीत असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

“राष्ट्रवादीला कोणीही एकटं हरवू शकत नाही. ना काँग्रेसमध्ये ती ताकद आहे, ना शिवसेनेमध्ये, भाजपामध्ये आहे. पण तिघे एकत्र या आणि नाथाभाऊला हरवा असं सुरु आहे. पण मतदार तसं होऊ देणार नाही,” असा विश्वास एकनाथ खडसेंनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या