रणजी स्पर्धे साठी पृथ्वी शॉकडे मुंबईची कमान, अजिंक्य रहाणे शॉच्या नेतृत्वात खेळणार


 दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतातली मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा म्हणजेच रणजी स्पर्धेचा हंगाम सुरू होत आहे. बीसीसीआयने त्याचे दोन टप्प्यात आयोजन करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी सर्व राज्यांनी आणि संघांनी तयारी सुरू केली आहे. मुंबईदेखील त्यापैकीच एक आहे. सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती लवकरच मुंबईच्या संघाची घोषणा करणार आहे.

मुंबई : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतातली मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा म्हणजेच रणजी स्पर्धेचा हंगाम सुरू होत आहे. बीसीसीआयने त्याचे दोन टप्प्यात आयोजन करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी सर्व राज्यांनी आणि संघांनी तयारी सुरू केली आहे. मुंबईदेखील त्यापैकीच एक आहे. सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती लवकरच मुंबईच्या संघाची घोषणा करणार आहे. त्याआधी अशी माहिती समोर आली आहे की, रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईची कमान युवा फलंदाज पृथ्वी शॉ  याच्याकडे असेल. तर भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेलाशॉच्या नेतृत्वात खेळावं लागेल अशी बातमी आहे. क्रिकबझ या वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.


वेबसाइटच्या वृत्तानुसार, शॉला कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय निवड समिती, प्रशिक्षक अमोल मजुमदार आणि संघाने अजिंक्य रहाणेशी बोलल्यानंतर घेतला आहे. रहाणेने विराट कोहलीचा उपकर्णधार म्हणून काम केले आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत सहा कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे त्यापैकी एकही सामना भारताने गमावलेला नाही. त्याने कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत कर्णधारपद भूषवले आणि संघाला विजयापर्यंत नेले होते.

रहाणे मार्गदर्शक म्हणून खेळण्यास तयार

वेबसाईटने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, रहाणे संघासोबत एक मार्गदर्शक म्हणून खेळण्यास तयार आहे आणि मुंबईने रणजी स्पर्धेत गमावलेली विश्वासार्हता परत मिळवण्यास मदत करेल. एमसीए अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “रहाणेसारख्या खेळाडूसाठी कर्णधारपद महत्त्वाचे नाही. एक कर्णधार म्हणून खेळाडूला जे काही मिळतं, ते सर्व त्याने आधीच मिळवलं आहे. संघासोबत मेंटॉर म्हणून खेळण्यासाठी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा नावलौकिक परत आणण्यासाठी तो तयार आहे. त्याला कर्णधारपदाबाबत कोणतीही समस्या नाही. त्याला कॅप्टन शॉचीदेखील काहीच अडचण नाही.


…म्हणून शॉला कर्णधार बनवण्याचा निर्णय

एमसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शॉला कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला होता कारण डिसेंबरमध्ये जेव्हा संघाची निवड करण्यात आली तेव्हा रहाणेच्या उपलब्धतेबाबत परिस्थिती स्पष्ट नव्हती. रहाणे त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत होता आणि 13 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार होती, पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता रहाणे देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध आहे आणि त्यामुळे मुंबई क्रिकेटच्या थिंक टँकने सर्व संबंधितांशी बोलून शॉला कर्णधारपदी कायम ठेवणेच संघाच्या हिताचे ठरेल, असा विचार केला आहे. शॉच्या नेतृत्वाखाली मुंबईने गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या