संभाजीराजेंचे आंदोलन भाजपप्रेरित, मात्र...; मराठा क्रांती मोर्चाने मांडली भूमिका


औरंगाबाद :
  मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे खासदार संभाजीराजे भोसले २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करणार आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादमध्ये मंगळवारी मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी बैठकीत उपस्थित सर्वांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तर संभाजीराजेंच आंदोलन भाजपप्रेरित असून, गादीला मान देण्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी होऊ अशीही भूमिका अनेकांनी मांडली.


संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात गुलाब विश्व हॉलमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची व समन्वयकांची बैठक झाली. यावेळी संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी केंद्रांविरोधात दिल्लीस्वारी पण करावी, मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आवाज उठवावा, तेव्हा अधिक ताकदीने आम्ही त्यांच्या सोबत राहू, अशी भूमिका मांडण्यात आली. तर संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील हजारो कार्यकर्ते मुंबईत जाणार असून, ज्यांना शक्य नाही ते औरंगाबादमध्ये अन्नत्याग आंदोलन करतील असा निर्णय घेण्यात आला.

संभाजीराजेंच आंदोलन भाजपप्रेरित

तर याचवेळी, संभाजीराजेंनी केवळ सहा प्रश्नच का घेतले? राज्य सरकार विरोधातच आंदोलन का? असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. तसेच संभाजीराजेंच्या खासदारकीची टर्म संपत आहे. पुन्हा खासदारकी हवी असेल तर त्यांनी आघाडी सरकारविरोधात आवाज उठवावा, असे भाजपकडून त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार मोजक्याच मागण्यांसाठी हे आंदोलन होत असल्याची टीका काही तरुणांनी केली. त्यामुळे या सर्व गोंधळातून काही महत्वाच्या नेत्यांनी काढता पाय काढून घेणं पसंद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या