पहिल्या कसोटीतील त्या वादग्रस्त निर्णयावर अखेर रोहितने मौन सोडले

 


भारताचा कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात डाव घोषित का केला याचे कारण पत्रकार परिषदेत सांगितले.

मोहाली: भारतीय क्रिकेट संघाने मोहाली येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एकतर्फी विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार रविंद्र जडेजा ठरला, त्याने पहिल्या डावात नाबाद १७५ धावांची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ४ अशा ९ विकेट घेतल्या. भारतीय संघाची या कसोटीत शानदार अशी कामगिरी झाली. पण सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे द्विशतकाच्या जवळ आल्यानंतर भारताने डाव घोषित का केला? कर्णधार रोहित शर्माच्या या निर्णयावर अनेकांनी सोशल मीडियावरून जोरदार टीका देखील केली. आता यावर प्रथमच रोहित शर्माने मौन सोडले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने रविंद्र जडेजाचे कौतुक केले. तो एक स्टायलिस्ट ऑलराउंडर आहे. भारताच्या पहिल्या डावात जेव्हा तो १७५ धावांवर खेळत होता तेव्हा त्यानेच आग्रह केला की डाव घोषित करावा. रोहितने जेव्हा डाव जाहीर केला तेव्हा सर्वांनी त्याच्यावर टीका केली. या घटनेची तुलना अनेकांनी १८ वर्षापूर्वी झालेल्या राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील प्रसंगाशी केली. तेव्हा सचिन १९४ धावांवर खेळत होता आणि कर्णधार राहुल द्रविडने डाव जाहीर केले. भारताने श्रीलंकेविरुद्ध टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने पहिल्या डावात ८ बाद ५७४ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेला दोन्ही डावात २००च्या आत बाद करून भारताने सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला. याच बरोबर मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रोहित शर्माने जेव्हा डाव घोषित केला तेव्हा जडेजाने ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमी सोबत १०३ धावांची भागिदारी केली होती. द्विशतकापासून तो फक्त २५ धावा दूर होता. जर २०-२५ मिनिटे दिली असती तर तो द्विशतक करू शकला असता.

भारताचा डाव घोषित करणे आणि जडेजाचे द्विशतक यावर बोलताना रोहित म्हणाला, एक प्रश्न हा होता की डाव जाहीर करायचा की नाही. हा निर्णय संपूर्ण संघाचा आणि जडेजाचा होता. यावरून लक्षात येते की तो किती निस्वार्थी आहे. विशेष म्हणजे जेव्हा रोहित शर्मावर आरोप केला जात होता, तेव्हा स्वत: जडेजाने पत्रकार परिषदेत हा निर्णय माझा होता, असे म्हटले होते.

काय म्हणाला होता जडेजा

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपाल तेव्हा जडेजाने रोहित शर्माच्या निर्णयाचे समर्थन केले. मी स्वत: डाव घोषित करण्याचा मेसेज रोहितला पाठवला होता. रोहितने कुलदीपकडून मला संदेश पाठवला होता की माझ्या २०० धावा झाल्यानंतर डाव घोषित केला जाईल. पण मीच या गोष्टीला विरोध केला. कारण थकलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांना टी-ब्रेकच्या आधी फलंदाजीला बोलवले तर भारताला लवकर विकेट मिळू शकतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या