शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक


  मोदींच्या कालच्या वक्तव्यानंतर घडमोडींना वेग

मुंबई : आज राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यात आज तातडीची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडत आहे. या बैठकीला काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. कालच पंतप्रधान मोदी यांनी चार राज्यातील विजयानंतर ईडीच्या कारवाईंवरून इशारा दिला होता. काही लोक ईडीच्या कारवाईंना धार्मिक रंग देत आहेत. मात्र मी भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे पवारांचे नाव न घेता मोदींनी म्हटलं होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गोवा, उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यात जोरदार फटका बसला होता. तर भाजपची पुन्हा एकदा सरशी झाली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.


बैठकीत कोणत्या विषयावर खलबतं?

महाराष्ट्रात पालिका निवडणुका तूर्ताप पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरीही पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी राज्यातील निवडणुकांसाठी आधीच रणनिती ठरवावी लागणं अपरिहार्य ठरणार आहे. त्यासाठी राज्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांची बैठक बोलावली असल्याचा तर्क जाणकारांकडून लढवला जातो आहे. कालच पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेत. त्यात आम आदमी पार्टी सोडली तर इतर पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसचीही अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तर राष्ट्रवादीच्या हातीही भोपळा लागला आहे. तसेच गोव्यात शिवसेनेला काही जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र तिथेही शिवसेनेच्या पदरी नोटापेक्षाही कमी मतं आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. त्यानंतर आता राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय.


काल मोदी काय म्हणाले?

भ्रष्टाराचाविरोधात कारवाई व्हावी की नाही? पण काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत. असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. कारण नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शरद पवारांनी यावर भाष्य केले होते. मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दाऊशी जोडला जातोय असा आरोप पवारांनी केला होता. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर कोर्टाच्या निर्णयावरही सवाल उपस्थित केले आहेत. त्याचाही मोदींनी गुरूवारी समाचार घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीती नेत्यांविरोधात ज्या कारवाई सुरू आहेत, त्या भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यावरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या