बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचे आखाडे, तमाशांसह भरगच्च कार्यक्रम


 निर्बंधमुक्तीनंतर गावगाडय़ाच्या अर्थचक्राला गती 

पिंपरी: दोन वर्षांहून अधिक काळ करोनाच्या विळख्यात गेल्यानंतर गुढीपाडव्यापासून निर्बंधमुक्त वातावरणामुळे सर्वानीच मोकळा श्वास सोडला. त्याचाच एक भाग म्हणजे गेल्या काही दिवसांपासून गावोगावच्या यात्रांमुळे जिकडेतिकडे उत्सवी वातावरण दिसू लागले आहे. बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचे आखाडे, लोकनाटय़ तमाशांसह भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होऊ लागली आहे. त्यामुळे गावगाडय़ाच्या अर्थचक्राला एकप्रकारे गती प्राप्त झाली आहे.

पै-पाहुण्यांना निमंत्रणे, विविध रूचकर पदार्थाचा समावेश असणाऱ्या जेवणावळी, देवपूजा, देवदर्शन, पालखी सोहळा, गावातील एकूणच उत्सवी वातावरण अशा एक ना अनेक गोष्टी दरवर्षी दिसून येत होत्या. मार्च २०२० पासून करोनाचा प्रादुर्भाव झाला आणि नेहमीचे उत्सवी वातावरण एकदम सुतकी वातावरणात बदलून गेले. घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले. रस्त्यावरील वावर कमी झाला. गर्दी टाळण्याचे शासकीय आदेश देण्यात आले. त्यामुळे जागोजागी शुकशुकाट जाणवू लागला. आजूबाजूला करोना रुग्णांची तसेच करोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या वाढू लागल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. सगळं जनजीवनच ठप्प झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत उत्सव साजरा करणे शक्यच नव्हते आणि तशी कोणाची मानसिकताही राहिलेली नव्हती.

मात्र, गुढीपाढव्यापासून राज्य शासनाने करोनाचे जवळपास सर्वच निर्बंध मागे घेतले. गर्दी होणाऱ्या ज्या-ज्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली होती, ती उठवण्यात आली. त्यात गावोगावच्या यात्रांचा समावेश होता. निर्बंधमु्क्त होताच गावांमधील उत्सव कमिटय़ांमध्ये उत्साह संचारला. यंदा उत्सव जोरात करायचा, या भावनेतून सगळे तयारीला लागले. बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचा आखाडा, लोकनाटय़ तमाशा अशा पद्धतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


गावोगावी उत्सव कमिटय़ांचा उत्साह पराकोटीला

पुणे, पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील बदललेले चित्र ठळकपणे दिसून येत आहे. तळेगावच्या यात्रेपासून यात्रांचा हंगाम सुरू झाला, त्यापाठोपाठ एकेक करत आजूबाजूच्या गावांच्या यात्रा सुरू झाल्या. वाकड-हिंजवडीची बगाड यात्रा पंचक्रोशीत सर्वात प्रसिद्ध आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा प्रचंड उत्साह होता. हजारोंची गर्दी झाली होती. हीच परिस्थिती आजूबाजूच्या गावांमध्ये होती. भोसरीतील यात्रा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. प्रचंड उत्साहाबरोबरच गावकीच्या राजकारणाचा प्रत्यय भोसरीत आला.

पिंपरी-चिंचवड परिसराचे शहरीकरण झाले असले तरी अजूनही ग्रामीण संस्कृतीचा बाज टिकून आहे. यात्रा, जत्रा, सण, समारंभातून तो दिसून येतो. जत्रा, उरुस हा ग्रामीण संस्कृतीमधील कुळाचार आणि आनंदोत्सव आहे. यात्रेत खेळण्याच्या दुकानापासून मनोरंजक कार्यक्रमांपर्यंत तर पारंपारिक वाजंत्र्यांपासून कुस्ती आखाडय़ापर्यंत सर्वाचा समावेश असतो. करोना काळात सर्वकाही बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांवर त्याचा परिणाम झाला होता. आता पुन्हा नव्या जोमाने त्यांचे व्यवसाय सुरू झाल्याने गावगाडय़ाच्या अर्थकारणाला गती मिळू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या