…बाबासाहेब पुरंदरेंचं ते पत्र १६ वर्षांनी बाहेर का काढलं?; राज ठाकरेंना सवाल

 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा मेळाव्यातील सभा आणि ठाण्यातील उत्तर सभा यामुळे मशिदींवरी भोंग्यांसोबत आणखी एक विषय सध्या चर्चेत आहे. हा विषय बाबासाहेब पुरंदरे यांचा आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी घराघऱात छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवले असं राज ठाकरे सांगत असताना दुसरीकडे शरद पवारांनी त्यांनीच जेम्स लेनला चुकीची माहिती दिल्याचं म्हटलं आहे. यानंतर मनसेने २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं एक पत्रच जाहीर करत शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. या वादात आता संभाजी ब्रिगेडनेही उडी घेतली आहे.


संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी टीव्ही ९ शी बोलताना, बाबासाहेब पुरंदरे यांनी जाहीर सभांमधून पुस्तकाचा प्रचार केल्याचा आरोप केला आहे. तसंच शिवप्रेमींच्या विरोधानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली असंही ते म्हणाले आहेत.

“‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे पुस्तक जेम्स लेन या अमेरिकेतील लेखकाने लिहिलं. याचं सर्वात पहिलं कौतुक किंवा चर्चा बाबासाहेब पुरंदरे यांनी सोलापुरात जनता व्याख्यानमाला, हुतात्मा मंदिर येथे केली. ही चर्चा झाल्यानंतर लोकमतमध्ये लेख छापून आले आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी पुस्तकाचं प्रचंड कौतुक केलं. मग सगळे याकडे आकर्षित झाले,” असंही ते म्हणाले.


“पुस्तक वाचताना यामध्ये आक्षेपार्ह मजकूर असल्याचं लक्षात आलं. कोल्हापुरातील इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, वसंतराव मोरे यांनी पहिल्यांदा एक पत्रक काढलं ज्यावर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वाक्षरी केली ही गोष्टही खऱी आहे. पण त्यांनी सही करण्याशिवाय दुसरी कोणती भूमिका घेतल्याचं मला तरी माहिती नाही. हे पत्र इतक्या वर्षानंतर बाहेर आलं आहे जे कधी मीडियात, चर्चेत आलं नाही. एका सहीने तर बाबासाहेब पुरंरदेंना सूट दिली तर हा आमच्यावर अन्याय आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.


“पुरंदरेंचं पुस्तक कादंबरी आहे. राजा शिवछत्रपती कादंबरीत त्यांनी दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी यांना अनन्यसाधारण महत्व दिलं आहे. राज ठाकरेंचं म्हणणं आहे की, आक्षेप आहेत त्यावर चर्चा करा. पण आम्ही पुण्यात चर्चा ठेवली होती तिथे पुरंदरे आलेच नव्हते,” अशी माहिती प्रवीण गायकवाड यांनी दिली.


“शरद पवारांचं बहुजन विचारांचं राजकारण आहे. त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर या तिघांच्याही नावे पुरस्कार मिळाला आहे. बहुजन समाजाला शऱद पवार जातीवादी नाहीत हे माहिती आहे. राजकारणासाठी किंवा कोणाच्या तरी सांगण्यावर प्रतिमा मलीन करण्यासाठी राज ठाकरे बोलले असं वाटतं. आघाडी सरकारचे ते प्रमुख असून यात त्यांची मुख्य भूमिका आहे. रामदास आठवले, छगन भुजबळ, मधुकर पिचड, लक्ष्मण माने अशा अनेकांना त्यांनी संधी देत घडवलं आहे. जे शरद पवारांना जातीवादी मानतात ते धर्मांध आहेत. दंगली घडतील असं वक्तव्य करायचं आणि दुसरीकडे बोट दाखवायचं हे वागणं बरोबर नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या