“भाजपाचा तोच अजेंडा राज ठाकरे राबवीत आहेत,”

 

सामनामधून गंभीर आरोप; म्हणाले, “हनुमंताच्या नावावर दंगली…”
मनसेप्रमुख राज ठाकरे हे सुरुवातीला ‘मराठी माणूस व अस्मितेचा प्रश्न’ घेऊन उभे राहिले. शिवसेनेसमोर हा विषय टिकला नाही तेव्हा आता ते हिंदुत्वाच्या दिशेने वळले व मशिदींवरील भोंगे बंद झाले नाहीत तर मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’ वाचू असा इशारा देऊन मोकळे झाले. भारतीय जनता पक्षाला हवा तोच अजेंडा श्री. राज ठाकरे राबवीत आहेत असा आरोप शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून केला आहे.

मुंबई-ठाण्यात महापालिका निवडणुकांची ही तयारी व हनुमंताच्या नावावर दंगली घडल्या तर महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर राष्ट्रपती शासन, असा हा ‘गुणरत्नी’ खेळ सुरू आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
“महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांचे, तर देशात इतरत्र रामनवमीच्या दंगलींचे राजकारण सुरू झाले आहे. धर्मांधतेची आग लावून, शांततेला चूड लावून कुणाला निवडणुका जिंकायच्याच असतील तर ते देशाच्या दुसऱ्या फाळणीचे सुरुंग स्वतःच्याच हाताने पेरताना दिसत आहेत. ‘देशाचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, पण धार्मिक विद्वेष निर्माण करून निवडणुका जिंकायच्या’ असे धोरण भाजपासारख्या पक्षाने उघडपणे स्वीकारले आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

“भाजपा किंवा त्यांच्या ‘बी’ टीमने अशा यात्रा काढल्या तर हमखास गडबड”
“पश्चिम बंगालात हावडा-शिवपूर भागातही धार्मिक तणाव निर्माण झाला. विश्व हिंदू परिषदेने रामनवमीची यात्रा काढली. त्यात भडकाऊ भाषणे केली. त्यातून आग पेटली. रामनवमीत भडकाऊ भाषणांची प्रथापरंपरा कधी सुरू झाली? अशोक सिंघल विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख होते तोपर्यंत या प्रथापरंपरा नव्हत्या, मग हे सर्व आता कोण घडवत आहे? मुंबईत शिवसेनेने हिंदुत्वाच्या शोभायात्रा काढल्या तर त्यावर हे असे हल्ले वगैरे होणार नाहीत, पण भाजपा किंवा त्यांच्या ‘बी’ टीमने अशा यात्रा काढल्या तर हमखास गडबड होईल याची व्यवस्था करून ठेवलेली दिसते. रामनवमीच्या दिवशी झालेली हिंसा तेच सांगते,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
“जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रामनवमीच्या दिवशी ‘शाकाहार-मांसाहार’ या वादावरून दंगल पेटवण्यात आली. त्यात दहा विद्यार्थ्यांची डोकी फुटली. ते सर्व विद्यार्थी हिंदूच होते. रामजन्मदिनी ‘मांसाहार’ करायचा नाही इथून वाद सुरू झाला तो ‘रामनवमी’ उत्सवास विरोध केला म्हणून ‘राडा’ झाला या मुद्दय़ापर्यंत येऊन थांबला. देशभरात हिंदू-मुसलमानांत आग लावायची, दंगे भडकवायचे, त्याच आगीवर निवडणुकांच्या भाकऱ्या शेकवायच्या हा राजकीय खेळ देशाला जाळून टाकणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“हरिद्वारच्या एका हिंदू मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी येत्या पंधरा वर्षांत अखंड हिंदू राष्ट्र निर्माण होईल असे सांगितले. हातात काठी घेऊन अहिंसेच्या मार्गाने अखंड हिंदू राष्ट्र तयार करू ही कल्पना चांगलीच आहे, पण रामाच्या नावाने अशा हिंसेचे तांडव करून देश अस्थिरता व तणावाच्या खाईत ढकलला जात आहे. त्यातून नव्या फाळणीची बिजे रोवली जातील व अखंड हिंदुस्थान करताना धार्मिक विद्वेषातून निर्माण झालेले आपल्याच देशाचे तुकडे तुकडे वेचावे लागतील. एका फाळणीसाठी माथेफिरू गोडसे निर्माण झाला. गांधींना त्याने मारले. मरताना गांधी ‘हे राम’ म्हणाले! आज तोच राम अहंकार, धर्मांधतेच्या अग्नीत देश जळताना पाहत आहे! रामाच्या नावाने तुकडे तुकडे गँग निर्माण होणार असेल तर अखंड हिंदू राष्ट्र कसे निर्माण होणार? रामाच्या नावाने निवडणूक जिंकाल, पण देश राहील काय?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या