‘तुझ्यात जीव रंगला’मधील ‘लाडू’ची थेट चित्रपटात एंट्री! नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला


काही वर्षांपूर्वी झी मराठीवर सुरू झालेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका बरीच गाजली होती. अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं होतं. याच मालिकेतील बालकलाकार लाडू म्हणजेच राजवीरसिंह राजे गायकवाडही त्यावेळी बराच चर्चेत आला होता. या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला राजवीर आता थेट चित्रपटात दिसणार आहे. एका वेगळ्या भूमिकेतून तो आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


देशभक्तीच्या भावनेने भरलेला ‘भारत माझा देश आहे’ हा चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा एका गावातील आहे, जिथल्या प्रत्येक घरातील व्यक्ती सैनिकात आहे. टीव्हीवर झळकलेल्या एका ब्रेकिंग न्यूजनंतर सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांची घालमेल आणि भीती यात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाक मंगेश देसाई, हेमांगी कवी, शशांक शेंडे, छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि याच चित्रपटातून राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत हे दोन चिमुकले चेहरे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या दोघांचाही हा पहिला चित्रपट असून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी व्यक्तिरेखा या चिमुरड्यांनी साकारली आहे. यापूर्वी राजविरसिंह राजे गायकवाड ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘लाडू’ या व्यक्तिरेखेमुळे घराघरांत पोहोचला. ‘भारत माझा देश आहे’च्या माध्यमातून राजविरसिंह चित्रपटात पदार्पण करत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात,” या चित्रपटात या दोन्ही बालकराकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या दोघांच्या माध्यमातून आम्ही सामाजिक संदेश देण्याच्या प्रयत्न करत आहोत. हा चित्रपट प्रत्येक पाल्याने आपल्या पालकांसोबत आवर्जून पाहावा असा आहे. सामाजिक संदेश देण्याबरोबरच प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा चित्रपट असून यात एका बकरीचीही प्रमुख भूमिका आहे. ती कशी हे चित्रपट पाहिल्यावर कळेलच.’’ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या