माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी तगादा; विवाहितेचा संशयास्पद मृत्यू


 अहमदनगर: आपल्या टायरच्या दुकानाचा विस्तार करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, असा तगादा सासरच्या मंडळींनी लावला होता. त्यानंतर रविना सुनिल सांगळे (वय २६, रा. सोनेवाडी ता. संगमनेर) या विवाहितेचा गळफास लागून मृत्यू झाला. मात्र, ही आत्महत्या नसून खून आहे. त्यामुळे सासरच्या मंडळींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलिस ठाण्यासमोर आक्रमक होत आंदोलन केले.

यातील मृत रविना हिचा विवाह २०१६ मध्ये सुनिल सांगळे (रा. सोनेवाडी) याच्यासोबत झाला होता. सुनिलचे टायरचे दुकान चांगले आहे. त्याचा विस्तार करण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी रविना हिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. मात्र, तिच्या माहेरची परिस्थिती जेमतेम असल्याने एवढे पैसे आणने शक्य नव्हते. काही दिवसांत सर्व सुरळीत होईल, या आशेवर ती होती. मात्र १६ एप्रिलला गळफास लागून तिचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केल्याचा दावा सासरच्या मंडळींनी केला.

याची माहिती मिळाल्यानंतर मृत विवाहिता रविना हिचे नातेवाईक संगमनेर पोलिस ठाण्यात आले. रविना हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप त्यांनी केला. शांताराम वनवे (रा. जांभुळवाडी, हिवरगाव पाठार, संगमनेर) यांनी तशी तक्रार देत आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी चौकशी करू अशी भूमिका घेताच, जमाव आक्रमक झाला. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. शेवटी पोलिसांनी सुनिल बबन सांगळे, बबन दत्तात्रय सांगळे, तानाजी बबन सांगळे, यांच्यासह अन्य दोन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींच्या अटकेची कारवाई सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या