मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं; याचिका फेटाळली


 ‘…काही अपेक्षा करणं चुकीचं आहे”

मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या राणा दांपत्याला मुंबई हायकोर्टाने धक्का दिला आहे. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आहे. प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा (भादंवि कलम १२४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याला रविवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान कोर्टाने सुनावणीदरम्यान राणा दांपत्याला फटकारलं. दरम्यान दुसऱ्या प्रकरणात अटक केली जाणार असल्यास ७२ तासांची नोटीस द्यावी असं कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे.


नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुंबई पोलिसांनी आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावेळी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार कोर्टाने तात्काळ सुनावणी घेतली. मात्र यावेळी कोर्टाने याचिका फेटाळली असल्याने राणा दांपत्याला दिलासा मिळाला नाही.

आपल्या अशिलांसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप राणा दांपत्याकडून करण्यात आल्यावर कोर्टाने उपरोक्त बोल सुनावले. “जबाबदार पदावर असणाऱ्यांनी विशेषकरून लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदराने बोलावे आणि वागावे असे आम्ही वारंवार म्हटलं आहे. परंतु त्याकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करतात. लोकप्रतिनिधींकडून याप्रकरणी काही अपेक्षा करणे चुकीचे आहे,” अशा शब्दांत कोर्टाने सुनावलं आहे.

दरम्यान राणांच्या वकिलांना कोर्टात युक्तिवाद करताना एकाच प्रकरणात दोन एफआयआर दाखल करण्यावर आक्षेप घेतला. जर रात्री उशिरा एफआयआर दाखल झाला होता तर त्यातच दुसरं कलमही लावायला हवं होतं असा युक्तिवाद वकिलांनी केला. एका प्रकरणात जामीन मिळाला तर दुसऱ्या प्रकरणात अटक करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान सरकारी वकिलांनी नवनीत राणा यांनी पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्यानेच दुसरा एफआयआर दाखल केल्याचं सांगत त्यांनी पोलिसांना सहकार्य करायला हवं होतं असं म्हटलं.


कोर्टाने फेटाळली याचिका

कोणाच्या घरासमोर वा कुठेही धार्मिक गोष्ट पार पाडत असेल तर ते वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. याप्रकरणी सार्वजनिक रस्त्यावर हनुमान चालिसाचे पठण करण्यात येण्यासंबंधी याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं. राणा दांपत्य जबाबदार पदावर असूनही त्यांनी हे विधान केले आणि कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवेल होईल अशी स्थिती निर्माण केली. तसंच राणा दांपत्यावरील दोन्ही गुन्हे एकाच घटनेचा भाग असल्याचं न्यायालयानं अमान्य केलं. आणि राणा दाम्पत्याची दुसरा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली.

राणा दांपत्याविरोधात कलम १५३ अ बरोबरच विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून शनिवारी अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रविवारी स्पष्ट झालं. त्यांना रविवारी दुपारी वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आलं. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचाही गुन्हा असल्याने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती घरत यांनी केली. राणांच्या वतीने त्यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पोलिसांच्या कोठडीला विरोध करताना त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी विनंती केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नवनीत आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या वेळी न्यायालयाने तपास अधिकारी आणि वकिलांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितलं आहे. करोना चाचणीनंतर नवनीत राणा यांना भायखळा तर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात पाठवण्यात आलं.


आणखी एक गुन्हा

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी आणखी एका गुन्ह्याची नोंद केली आहे. शनिवारी कारवाईसाठी गेलेल्या खार पोलिसांशी राणा दाम्पत्याने अरेरावीची भाषा करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी खार पोलीस ठाण्यातही पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत राणा दाम्पत्यावर पोलिसांनी हुज्जत घालून सरकार कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या