“हिंदी सिनेसृष्टीला मी परवडणार नाही, त्यामुळेच…”, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचे बॉलिवूडबद्दल धक्कादायक वक्तव्य


दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूला ओळखले जाते. महेश बाबूने अभिनयासोबत आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झालेला हा अभिनेता नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच महेश बाबूने यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे. “हिंदी सिनेसृष्टीला मी परवडणार नाही. त्यामुळे हिंदी चित्रपट करुन मला माझा वेळ फुकट घालवायचा नाही”, असे महेश बाबू म्हणाला.


अभिनेता महेश बाबूचे जगभरात लाखो चाहते आहेत. महेश बाबूचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतो. गेल्या काही महिन्यांपासून महेश बाबू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे चर्चा रंगल्या आहेत. सध्या महेश बाबू ‘सरकारु वारी पाटा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या १२ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल भाष्य केले आहे.

यावेळी त्याला ओटीटीसह बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, “मी मोठ्या पडद्यावरच चांगला दिसतो. सध्या मी ओटीटीबद्दल काहीच विचार केलेला नाही. पण बॉलिवूडला मात्र मी परवडणार नाही.”


“मला बॉलिवूडमधून फार जास्त ऑफर मिळालेल्या नाहीत. पण मला वाटत नाही की त्यांना मी परवडेन आणि मला अशा सिनेसृष्टीत काम करायचे नाही ज्यांना मी परवडत नाही. जो स्टारडम किंवा आदर मला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मिळतो तो फार मोठा आहे. त्यामुळे मी माझी सिनेसृष्टी सोडण्याबद्दल कधीच विचार शकत नाही. मी नेहमीच चांगले चित्रपट करायचा आणि ते हिट होण्यासाठी प्रयत्न केला आहे. माझी स्वप्ने आता पूर्ण होत आहेत. मला आता अधिक आनंदी व्यक्ती बनायचे नाही”, असे महेशबाबू म्हणाला.

काही आठवड्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत महेश बाबू यांना हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाला, “मला हिंदी चित्रपटात काम करण्याची गरज नाही. कारण आता तेलुगू चित्रपट देशभरात पाहायला मिळतात. त्यामुळे मला कोणत्याही खास हिंदी चित्रपटात काम करण्याची गरज नाही.”

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सरिलेरू नीकेव्वरू  या चित्रपटात महेश बाबू झळकले होते. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता तो सरकार वारी पेटला  या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या