मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना जीवे मारण्याची धमकी


कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे. धमकी देणारा फोन हा परदेशातील क्रमांकावरून आल्याचं वैभव खेडेकर यांनी सांगितलं आहे.

याबाबत ते खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीने वैभव खेडेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खेडेकर यांनी केला आहे. वैभव खेडेकर यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणात महाआरती आणि मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळेच धमकी देणारा फोन आल्याच त्यांचं म्हणणं आहे. आता वैभव खेडकर त्यांना आलेल्या धमकीच्या फोनबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहेत.

वैभव खेडेकर हे मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस आहेत. यापूर्वी अनेक वेळा वैभव खेडेकर हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहेत. एखादं आक्रमक आंदोलन किंवा एखाद्या अधिकाऱ्याला मनसे स्टाइलनं दिलेला झटका यामुळे वैभव खेडकर कायम चर्चेत असतात.

वैभव खेडेकर हे खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. मनसेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांची नोंद आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल महिन्यात खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवलं आहे. नगराध्यक्ष पदावर असताना नियमबाह्य काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

नियमबाह्य पद्धतीने देयके प्रदान करणं, मान्यता नसतानाही खासगी वाहनात सरकारी खर्चाने इंधन भरणे, इतिवृत्तांत बदल करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभव खेडेकर यांना नगराध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या