“ज्यांना घरातून बाहेर काढले आहे आणि ज्यांची लायकी…”


अकबरुद्दीन ओवेसींचा राज ठाकरेंवर निशाणा

औरंगाबाद : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच अकबरुद्दीन यांनी या वेळी केलेल्या भाषणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. राज ठाकरे यांच्यावर टीका करताना अकबरुद्दीन यांनी राज शिवसेनेतून बाहेर पडल्याची आठवण करुन देत टोला लगावला. अकबरुद्दीन यांनी थेट राज यांचं नावं घेतलं नाही तरी मशिदींवरील भोंग्यांच्या विषयावर भाष्य करताना त्यांनी हे वक्तव्य केल्याने ही टीका राज यांच्यासंदर्भात होती, हे स्पष्टच आहे.

राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका करताना, “ज्यांना घरातून बाहेर काढले आहे आणि ज्यांची लायकी नाही त्यांना काय उत्तर देणार,” असा प्रश्न उपस्थित करीत अकबरुद्दीन यांनी भोंग्याबाबत सुरू असणाऱ्या वादाकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. “ज्यांचा एकही खासदार नाही, ते भुंकतायत, त्यांना भुंकू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तो टीआरपीचा खेळ आहे,” असेही ते यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांनी अप्रत्यक्षपणे राज यांना आव्हानही दिलं. “अकबरुद्दीन ओवेसी लढेल आपल्या आवडीच्या ठिकाणी आपल्या आवडीच्या वेळेवर लढेल. तुमच्या आवडीच्या ठिकाणावर नाही. मी वेळ ठरवणार, जागा मी ठरवणार,” असंही ते म्हणाले.

आक्रमक भाषणासाठी ओळखले जाणारे अकबरुद्दीन यांनी गुरुवारी केलेल्या भाषणात मुस्लिमांच्या शिक्षणातील घसरणीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच हैदराबादमध्ये ज्या पद्धतीने शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम केले आहे तसेच ते औरंगाबादमध्येही सुरू केले जाईल असे सांगितले. देशाच्या बांधणीमध्ये केवळ एक आणि एकच धर्म  किंवा जात पुढे जाणार असेल तर देश पुढे जाईल असे मानणारा माणूस मूर्ख असेल. देशात हिंदु, मुस्लीम, शीख, इसाई, पारशी, जैन सारेजण पुढे गेले तर देश पुढे जाईल. औरंगाबाद येथील शाळेत सर्व धर्मीयांना प्रवेश असेल, असेही अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले. 

खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांवर टीका होऊ लागल्यानंतर खासदार जलील यांनी स्पष्टीकरण दिले. जलील म्हणाले, खरे तर खुलताबादमध्ये अनेक दर्गा आहेत. त्यामुळे एकाचे दर्शन घेतले, दुसऱ्याकडे दुर्लक्ष केले असे करता येत नसते. त्यामुळे याचे वेगळे अर्थ काढण्यात येऊ नयेत असे ते म्हणाले. कबरीसमोर नतमस्तक होताना जलील यांनी भगवा रुमाल परिधान केला होता. या विषयी बोलताना ते म्हणाले,”भगवा, हिरवा, निळा सारे रंग माझे आहेत.”

औरंजेबाच्या कबरीसमोर आम्ही कधी नतमस्तक झालो होतो, असा सवाल करणारे खासदार जलील यांची जुनी चलचित्रेही समाजमाध्यमातून आवर्जून फिरत होती. या अनुषंगाने बोलताना माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी, शाळा बांधताय याबद्दल अभिनंदन, पण औरंगजेबाच्या कबरीसमोर नस्तमस्तक होणे ही कृती तेढ निर्माण करणारी असल्याचे म्हटले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या