“पुष्पा, आरआरआर चित्रपट सुपरहिट ठरले आणि…”, बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर स्पष्टच बोलला करण जोहर


 सध्या नवनवीन हिंदी चित्रपट बॉक्सऑफिसवर दाखल झाले आहेत. तर काही बिग बजेट हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. अशामध्येच सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटाची देखील सगळीकडे चर्चा रंगत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान करणने बॉलिवूड आणि साऊथ वादावर आपलं मत व्यक्त केलं.

बॉलिवू़ड-साऊथ वादावर काय बोलला करण जोहर?
‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान करणला बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर उत्तर देताना तो म्हणाला, “हिंदी किंवा साऊथ चित्रपटांमध्ये कोणतीच स्पर्धा नाही. ‘बाहुबली’ चित्रपट ज्यांनी प्रस्तुत केला त्यामध्ये माझा देखील सहभाग होता. तेव्हा मी भाषा नव्हे तर चित्रपटाची ताकद पाहिली आणि त्यावर विश्वास ठेवला. या दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये कोणतीच स्पर्धा नाही. आपल्याला एकत्रच पुढे जायचं आहे.”

‘जुग जुग जियो’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी ‘हिंदी चित्रपट ट्रेलर’ या शब्दावर करणने अधिक भर दिला. याबाबत देखील करणला विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, “आरआरआर, पुष्पा, केजीएफ, चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर उत्तम कमाई केली. हे चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे भारतीय चित्रपटसृष्टीची मान अधिक उंचावली. प्रशांत नील, राजामौली सरांनी जगभरात भारतीय चित्रपटसृष्टीचं स्थान आणखी बळकट केलं.”

‘गंगूबाई’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाने बॉक्सऑफिसवर उत्तम कामगिरी केली. हिंदी चित्रपटांनी देखील बॉक्सऑफिसवर उत्तमोत्तम कामगिरी केली पाहिजे अशी करणची इच्छा आहे. करणचा ‘जुग जुग जियो’ चित्रपट येत्या २४ जूनला चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या