माझ्याच माणसांनी मला दगा दिला....उद्धव ठाकरे

 





एकनाथ शिंदे गटाच्या बंडाआडून भाजपने डाव साधला

फडणवीसांनी 'मी पुन्हा येईन' सिद्ध केले

मुंबई : 


जे धोका देतील असं वाटत होतं, त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली आणि माझ्याच माणसांनी मला दगा दिला, अशी उद्विग्नता व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी बहुमत चाचणी पूर्वीच मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. महविकास आघाडी सरकारचं काम आपल्यासमोर आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू करून सरकारच्या कामाला सुरुवात झाली आणि आज बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला दिलेलं नाव संभाजीनगरला देऊन तसेच उस्मानाबादला धाराशिव देऊन पदाचा राजीनामा देत असल्याचे भावनिक उदगार मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढले. एकनाथ शिंदे आणि 39 आमदारांच्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले.

गेल्या १० दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक आता संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर बुधवारी अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. शिंदे गटाने ३९ आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावे असं सांगितलं. त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या बाजूने न लागल्याने उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची नामुष्की आली.


गेल्या १० दिवसात ठाकरे सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेक प्रयत्न केले, मात्र ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. एक अखेरचा प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरेंनी काल बंडखोर शिवसेना नेत्यांना भावनिक सादही घातली. मात्र, बंडखोर शिंदे गट त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर भाजपने खेळी केली. देवेंद्र फडणवीसांनी २८ जूनच्या रात्री राज्यपालांना पत्र देत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याने त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत उद्या विशेष अधिवेशन घेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.


बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते रात्री साडे आठ वाजेपर्यंत दिग्गज वकिलांचा युक्तिवाद सुरु होता, पहिल्यांदा शिवसेनेतर्फे अभिषेक मनु सिंघवी यांनी तब्बल ६८ मिनिटे जोरदार युक्तिवाद करत राज्यपाल कसे घटनाबाह्य वागले आणि उद्याच्या बहुमत चाचणी कशी घाईची ठरेल, यासंबंधीचा जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून नीरज किशन कौल, मनिंदर सिंग यांनी अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद क्षणोक्षणी खोडण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे राज्यपालाचं एकही पाऊल घटनाबाह्य नाहीये, हे सांगताना विविध घटनांचा उल्लेख सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला.


उद्याच्या विश्वासदर्शक ठरावाला स्थगिती देणार नाही, मात्र ११ जूनला सविस्तर सुनावणी ठेवू आणि विश्वासदर्शक ठरावाचा जो काही निर्णय असेल, तो सुप्रीम कोर्टाच्या त्या आदेशाच्या अधीन राहील, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
भाजप-शिवसेना युतीचं पाच वर्षांचं सरकार, त्यानंतर अडीच-अडीच वर्षांचा प्रश्नावरुन या युतीत पडलेली फूट, त्यानंतर शिवसेना -राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून स्थापन केलेलं ऐतिहासिक असं महाविकास आघाडी सरकार आणि आता पुन्हा अडीच वर्षांनंतर शिंदे गटाच्या बंडाळीमुळे मविआची ताटातूट झाली. या काही वर्षात महाराष्ट्राने राजकारणाचा अॅक्शन, कॉमेडी, थ्रील, सस्पेन्स, ड्रामा असलेला सुपरहिट सिनेमा पाहिला. यामध्ये वेळोवेळी हिरो आणि विलेनची भूमिका बदलताना आपण पाहिली. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस हे हिरो होते. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसताच फडणवीस विरोधी भूमिकेत दिसले. महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाविकास आघाडीचे हिरो ठरले. त्यांनी अडीच वर्ष सत्ता टिकवून ठेवली. मात्र, राजकारणातले चाणक्य मानले जाणाऱ्या फडणवीसांनी पुन्हा एकदा सूत्र आपल्या हातात घेतली आणि अखेर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
_______________


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या