“मी ना शिवसैनिक, ना राजकारणी तरीही…”, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ३९ आमदारांनी बंड पुकारल्याने निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामान्यानंतर भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन केले जात आहे. तर दुसरीकडे या राजकीय उलथापालथीनंतर केदार शिंदे, पराग कान्हेरे, आरोह वेलणकर यांसारखे अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकतंच या संपूर्ण घटनेवर अभिनेता किरण मानेंनी भाष्य केलं आहे.

किरण माने यांनी फेसबूकवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, अश्विनी ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे दिसत आहेत. हा फोटो शेअर करत ते, म्हणाले “…उद्धवजी, एकच शब्द : ‘ग्रेसफुल’! सत्यघटना सांगतो. सातार्‍याजवळ खिंडवाडी नावाचं एक छोटं गांव आहे. तिथं एका मित्राकडं काल मी जेवायला गेलो होतो. एकतर गांव खूप छोटं. त्यात गांवापासून लांब शेतात एकाकी असलेलं घर. गावाकडची साधी मानसं, राजकारणाशी-कुठल्या पक्षाशी काहीही संबंध नाही. पोटापुरतं कमवायचं आणि दुनियादारीशी संबंध नाही. बऱ्याच दिवसानंतर जमीनीवर मांडी घालून जेवायला बसलो आणि ही बातमी दिसली…”

पुढे किरण माने म्हणाले, “…कोणाचा विश्वास बसणार नाही, पण तुम्ही राजीनामा दिला हे कळल्यावर, त्या घरातला एकेक मानूस हळहळला. काही लोकांच्या डोळ्यांत पानी आलेलं मी काल माझ्या डोळ्यांनी बघितलं. घरातल्या लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं ‘चांगला मानूस होता!”

पुढे किरण यांनी सांगितले की, “उद्धवजी, खरं सांगू? मला खूप आनंद झाला. का ते नंतर सांगतो.. पण तुमच्या आयुष्यात जे घडलं, ते नवीन नाही. राजकारनात तर ‘कॉमन’ गोष्ट आहे. खर्‍या आयुष्यात गरीब असो वा श्रीमंत… सामान्य माणूस असो वा सेलिब्रिटी..त्याला स्वत:ला पराभवाचा सामना करावा लागतो. विश्वासघाताचं दु:ख सगळ्यांना पचवावं लागतं, पण अशावेळी खूप कमी लोक तुमच्यासारखे ‘धीरोदात्त’ असतात! तुमची चूक असेल असं मी म्हणतं नाही. तुमच्याकडून चूका झाल्या असतील. तरी सुद्धा जे घडलंय ते ‘माणूस’ म्हणून उद्ध्वस्त करणार होतं. तुम्ही आतून ‘तुटले’ नसाल का हो? जी माणसं तुमच्या पक्षाने शून्यातून वर आणली… त्या माणसाबरोबरचे सुरूवाती पासूनचे कित्येक आनंदा-दु:खाचे क्षण तुमच्या डोळ्यांसमोर आले नसतील का???

पुढे किरण माने म्हणाले, ” तुम्ही लोक धुतल्या तांदळासारखे नसता. तरीही मी फक्त ‘माणूस’ म्हनून विचार करतोय. मी स्वत: यातनं गेलोय. जवळच्यांनी पाठीत खंजीर खुपसल्यावर वेदना होतातच. काळीज तुटतंच. तरीबी ज्या संयमानं, उद्वेग-चिडचिड न करता, तारस्वरात न किंचाळता, शांतपने पद सोडलंत, ती वृत्ती ‘आजकाल’ लै दूरापास्त झालीय.”

पुढे किरण म्हणाले, “मला आनंद याचा झालाय की तुमी आता लै लै लै भाग्यवान आहात. सहजासहजी कुनाला मिळनार नाय, आज एकाबी नेत्याकडं नसंल अशी एक गोष्ट तुमच्याकडं हाय… कुठली? आता तुमच्याजवळ जे उरलेत ते अत्यंत नि:स्वार्थी, निष्ठावान, शुद्ध – स्वच्छ मनाचे कार्यकर्ते आहेत. भले संख्या कमी असेल, पन जे आहेत ते मनाच्या तळापास्नं ‘तुमचे’ आहेत. जितक्या नि:स्वार्थीपने तुमच्यासोबत रश्मीजी आणि आदित्य आहेत, तितक्याच नितळ भावनेनं आता उरलेले सगळे शिवसैनिकबी तुमचे आहेत. गाळ बाजूला गेला, आता शंभर टक्के ‘प्यूअर’ असलेला एकेक माणूस तुमच्यासोबत आहे. नशीबवान आहात! तुम्हाला राखेतनं झेप घ्यायचीय.. शून्यातनं विश्व उभं करायचंय.. हे लिहीनारा मी ना शिवसैनिक, ना राजकारनी. तुमी आयुष्यात कुठली मदतबी मला केलेली नाय आनि मी ती अपेक्षा बी कधी ठेवली नाय. तरीबी मला तुमच्याबद्दल आज हे वाटतंय, ही तुमची ‘ॲचिव्हमेन्ट’ आहे! “

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या