शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंना पहिलं यश: सोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाचा झेंडा

 


पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटासोबत संघर्ष सुरु असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिलं यश मिळालं आहे. सोलापूरमधील चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. ठाकरे गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीमधील सर्व सात जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालाने सोलापुरात वर्चस्व असणारे माजी सहकारमंत्री आणि भाजपा आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून सर्वात प्रथम चिंचपूर ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या गटाने सातपैकी सर्व सात जागा जिंकत भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाला धक्का दिला आहे. माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे

आज राज्याच्या १५ जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागत आहे. या निवडणुकीचा निकाल काय असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या