भारतीयांना 5G च्या रूपानं ही अद्भुत भेट :पंतप्रधान नरेंद्र मोदी

 



भारतात 5G ​​ची सुरुवात ही भारताच्या दूरसंचार इतिहासातील सामान्य घटना नाहीय. ही सेवा म्हणजे, 130 कोटी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा आहेत. 5G सह भारत सब का डिजिटल साथ आणि सब का डिजिटल विकासाच्या दिशेनं एक मजबूत पाऊल उचलेल. भारतानं थोडी उशीरा सुरुवात केली असेल. परंतु, आम्ही जगापेक्षा उच्च दर्जाची आणि अधिक परवडणारी 5G सेवा आणणार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं. ते 5G सेवेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

मोदी म्हणाले, आजच्या तारखेची इतिहासात नोंद होणार असून भारतानं आज नवा इतिहास रचला आहे. 5G मुळं गावागावांत क्रांती होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळं शिक्षणात क्रांती झाली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत आपल्या देशातील प्रत्येक शहर, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक तहसीलमध्ये 5G पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. Jio ची 5G सेवा भारतात विकसित झाली आहे, त्यामुळं त्यावर आता आत्मनिर्भर भारतचा शिक्का नोंदवला गेला आहे. भारतीय दूरसंचार उद्योग म्हणून, आम्ही जे काही दाखवलं आहे त्याचा मला खूप अभिमान आहे. आता आम्ही नेतृत्व करण्यास तयार आहोत, असंही मोदींनी स्पष्ट केलं.

आज महत्त्वाचा दिवस आहे. एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे. ही सुरुवात स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात होत आहे. यामुळं लोकांसाठी अनेक नवीन संधी खुल्या होतील, असं भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक-अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितलं.

5G साठी आम्ही पुढाकार घेण्यास तयार आहोत. 5G कनेक्टिव्हिटी हे तंत्रज्ञानाच्या पुढील पिढीपेक्षा बरंच काही आहे, असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितलं.

आज पंतप्रधान मोदी भारतात 5G सेवा लाँच करत आहेत. आजचा दिवस दूरसंचाराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. टेलिकॉम हे डिजिटल इंडियाचा पाया आहे. डिजिटल सेवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं हे माध्यम आहे, असं दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या