उद्धव ठाकरेंकडून खा. शरद पवारांचं तोंडभरून कौतुक !



शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याचं कौतुक केलं आहे. शरद पवारांनी आज अंधेरी पोटनिवडणुकीबाबत पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपला आहे, त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांची सदैव आभारी राहील, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी हे विधान केलं आहे.

संबंधित प्रसिद्धीपत्रकात उद्धव ठाकरे म्हणाले, “राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे, हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच. परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. स्वर्गीय रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणूक लागली आणि शिवसेनेनं ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निश्चय केला.

पण त्यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला. मात्र, न्याय देवतेने न्याय दिला. वास्तविक महाराष्ट्राचं राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेलं आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, आर. आर पाटील, भाजपाच्या गिरकर ताई, यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरुन संबंधित पोटनिवडणुकीत शिवसेनेचा अधिकृत उमेदवार दिला नाही.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. त्यातून शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांची सदैव आभारी राहील. यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाज आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचं काम केलं आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचं कार्य करेल, अशी मला खात्री आहे, असंही उद्धव ठाकरेंनी पत्रकात म्हटलं. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या