राज्यपाल कोश्यारी यांनी महिलांची माफी मागावी

काँग्रेसकडून मनुवादी मानसिकतेचा निषेध 


मुंबई 

राज्यपाल कोश्यारींचे मुलींबद्दलचे वक्तव्य संघाच्या मनुवादी विचारसरणीतून आले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी महिला आणि मुलींची माफी मागावी, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे. 

'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुलींच्या प्रगतीबाबत केलेले  वक्तव्य हे निषेधार्ह असून या विधानातून त्यांच्या बुरसटलेल्या मनुवादी विचारसणीचे दर्शन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिलांबद्दलची चूल आणि मुल ही शिकवण राज्यपाल महोदयांच्या मुखातून बाहेर आली असून राज्यपाल कोश्यारी यांनी या असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्याबद्दल देशातील मुली व महिलांची माफी मागितली पाहिजे,' असे ते म्हणाले. 

अतुल लोंढे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. 'पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. परंतु संघाच्या शिक्षणामुळे महिलांबाबतची संघाची मतंच त्यांच्या बोलण्यातून बाहेर आली,' असे लोढे यांनी म्हणाले. 'महिलांबद्दल संघाची मतं सर्वश्रुत आहेत. मनुस्मृतीला मानणारे हे लोक महिलांची प्रगती पाहू शकत नाहीत हेच राज्यपाल महोदयांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मुली शिकून अशाच प्रगती करत राहिल्या तर २० ते ३० वर्षानंतर देशात आयएएसमध्ये मुलांपेक्षा मुली जास्त संख्येने दिसतील त्यासाठी बॅलन्स साधण्याचे प्रयत्न करा, असे म्हणणे हा बुरसटलेल्या मनुवादी पुरुषसत्ताक मानसिकतेचा प्रकार आहे,' असेही ते म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या