महाराष्ट्रात दिखाऊ बंद!

संमिश्र प्रतिसाद; मुंबईत शिवसैनिकांची जबरदस्ती


मुंबई

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभर संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी बाजारपेठा कडकडीत बंद होत्या तर काही ठिकाणी बाजारपेठा सर्रास सुरु होत्या. या बंदवर आक्षेप 'हा सरकार पुरस्कृत दहशतवाद' असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्याचबरोबर पोलीस दलाचा वापर करत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जबरदस्तीने व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. दरम्यान महाराष्ट्रात बंद पाळून शेतकरी हिताचा दिखाऊपणा केला जात असल्याचा आरोप सामान्य जनतेतून केला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असताना एकमेकांवर आरोप करून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करीत असल्याची भावना शेतकरी व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र बंद पाळून केंद्र सरकारवर किती दबाव निर्माण होईल, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनावर काँग्रेस नेत्यांकडून मौन व्रत आंदोलन केले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या भाजपला आजच्या बंद बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे प्रत्युत्तर काँग्रेस नेत्यांनी दिले.

महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने हुतात्मा चौकात आंदोलन केले. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आंदोलनात सहभागी झाले. त्यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईत खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाल्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक हे देखील सहभागी झाले होते.

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. टिळक रोडवर बाईक रॅली काढत राष्ट्रवादीने निदर्शने केली.

नागपुरातील सक्करदरा चौकात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात झाले. यावेळी वाहतूक रोखण्यात आली. महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडावा असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

चेंबूरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर अमर महाल जंक्शन येथे काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या वेळी आंदोलकांनी रस्त्यावर बसून ठिय्या दिल्याचं पाहायला मिळालं. लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय. पूर्व द्रुतगती मार्गावर शिवसेनेनं टायर जाळत वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. बूरमधील घाटकोपर-माहुल लिंक रोडवर शिवसैनिक रस्त्यावर उतरले. या ठिकाणी जी दुकाने सुरु होती ती दुकानं शिवसैनिकांनी बंद करायला लावली. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले. मुंबईत बोरीवलीच्या गोराईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बंद पाळण्यासाठी जबरदस्ती केली. दुकानं, रिक्षा आणि खाजगी गाड्या शिवसैनिक बंद केल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या