महापुरुषांचे कार्य लोकांसमोर मांडण्याचा स्तुत्य उपक्रम - रामदास आठवले


पुणे 

"राजर्षी शाहू महाराजांचे कर्तृत्व आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य फार मोठे आहे. शाहू महाराजांच्या सहकार्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले आणि डॉ. आंबेडकरांच्या आदर्शातून अण्णाभाऊंनी प्रगल्भ साहित्य निर्मिले. अशा दोन महापुरुषांना या देखण्या स्मारकातून लोकांपुढे आणण्याचा उपक्रम स्तुत्य आहे," असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या विकासनिधी व संकल्पनेतून प्रभाग क्रमांक ८, औंध-बोपोडी येथे साकारलेल्या राजर्षी शाहू महाराज चौक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी साहित्य कट्ट्याचे लोकार्पण आठवले यांच्या हस्ते झाले. 

रामदास आठवले म्हणाले, "नगरसेवक, उपमहापौर म्हणून सुनीता वाडेकर चांगले काम करत आहेत. गेल्या पाच वर्षात 'रिपाइं'च्या तिघांना उपमहापौर होण्याची संधी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. भाजप हा संविधानाला मानणारा, दलितांचे प्रश्न सोडवणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानासमोर नतमस्तक होतात. त्यामुळे 'रिपाइं' भाजपसोबत आहे. येणाऱ्या निवडणुकीतही पुण्याची महापालिका भाजप-रिपाइंच्या युतीच्या हाती यावी, यासाठी सर्व समाजातील लोकांना एकत्र आणून पक्ष संघटन मजबूत करावे."

अविनाश महातेकर यांनी अण्णाभाऊ साठे साहित्यकट्टा म्हणजे आंबेडकरी विचाराला साजेशे असे स्मारक आहे. यातून अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर होईल, असे सांगितले. तर वाडेकर दाम्पत्याने समाजासाठी वाहून घेतले असून, तळमळीने समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी दोघेही काम करत असल्याचे सिद्धार्थ शिरोळे यांनी नमूद केले. परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या