१८ ऑक्टोबरपासून विमानं संपूर्ण प्रवासी क्षमतेनं ‘उड्डाण’ घेणार


नवी दिल्ली

कोरोनाची लाट ओसरत असल्यामुळे तसेच कोरोनाचे संकट कमी होत असल्याचे पहायला मिळत असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येतील घट लक्षात घेत केंद्र सरकारने देशांतर्गत विमान प्रवासावरील प्रवासी क्षमतेचे निर्बंध मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने १८ ऑक्टोबरपासून देशांतर्गत उड्डाणे १०० टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी दिली आहे.

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की १८ऑक्टोबरपासून सर्व देशांतर्गत उड्डाणे १०० टक्के क्षमतेने चालवली जातील. आतापर्यंत देशांतर्गत उड्डाणे ८५ टक्के क्षमतेने चालवली जात होती.

देशात आता १८ ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमान वाहतूक संपूर्ण प्रवासी क्षमतेनं होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे २३ मार्च २०२० पासून शेड्युल आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. पण मे २०२० पासून ‘वंदे भारत’ मिशन अंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली. याशिवाय निवडक देशांशी द्विपक्षीय ‘एअर बबल’ करार करुन जुलै २०२० पासून विमानसेवा सुरू आहे. देशांतर्गत विमान वाहतूक सध्या विमानाच्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ८५ टक्के क्षमतेनं सुरू आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या आदेशानुसार १८ सप्टेंबरपासून देशात ८५ टक्के प्रवासी क्षमतेनं विमान वाहतूक सुरू करण्यात आली होती. याआधी ५ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत विमान वाहतूक ६५ टक्के क्षमतेनं, तर १ जून ते ५ जुलैपर्यंत ५० टक्के प्रवासी क्षमतेनं सुरू होती.

आता प्रवासी क्षमतेवर असलेले निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. यानंतर, कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर, प्रवाशांची क्षमता हळूहळू वाढविली जात आहे आणि आता ती १०० टक्के केली गेली आहे. तथापि, उड्डाण दरम्यान कोरोना -१९ प्रोटोकॉलची काळजी घ्यावी लागणार असल्याचेही सूचित करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या