श्रीरामपूर पंचायत समिती सभापती संगीता शिंदे अपात्र

 डॉ.वंदना मुरकुटे होणार सभापती

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या लढाईला यश; माजी मंत्री विखे पाटलांना धक्का

श्रीरामपूर : श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती सौ.संगीता शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतीपदी डॉ.वंदना मुरकुटे यांची निवड निश्चित मानली जात असल्याने   श्रीरामपूर तालुक्यातील राजकारणात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला आहे.

सन २०१७ मध्ये चुरशीच्या झालेल्या श्रीरामपूर पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉ.वंदना मुरकुटे, अरुण पाटील नाईक, विजय शिंदे व संगीता शिंदे असे चार अधिकृत सदस्य विजयी झाले, पुढे सभापती निवडीच्या वेळी ओ बी सी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आठ सदस्यीय असणाऱ्या पंचायत समिती मध्ये डॉ. वंदना मुरकुटे व संगीता शिंदे या दोन महिला सदस्यांना संधी प्राप्त झाली त्यावेळी निवडीच्या आधी तालुक्यात एक नवे समीकरण उदयास आले,काँग्रेस पक्षाच्या सभापती पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ.वंदना मुरकुटे यांना घोषित केले असताना ऐनवेळी संगीता नाना शिंदे यांनी विरोधी सदस्यांची मदत घेऊन सभापती पद मिळवले. त्यामुळे शिंदे यांच्या विरोधात पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी या आशयाची याचिका गटनेत्या डॉ.वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे दाखल केली होती. या संदर्भात सभापती शिंदे यांनी वेळोवेळी मा.उच्च न्यायालय, मा.सर्वच्च न्यायालय येथे आव्हान दिले होते मात्र दोन्ही ठिकाणी सभापती शिंदे यांना दिलासा मिळाला नाही त्यामुळे आज आखेर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सभापती सौ.संगीता सुनील शिंदे यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम १९८६ मधील कलम ३(१) (ब) मधील तरतुदीनुसार आपात्र घोषित केले आहे.  त्यामुळे  काँग्रेसच्या गटनेत्या डॉ. वंदना मुरकुटे यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.डॉ.वंदना मुरकुटे यांच्या वतीने ॲड.दत्ता घोडके, तुळजापूर व ॲड.समीन बागवान,श्रीरामपूर ऍड माणिकराव मोरे नगर यांनी कामकाज पाहिले.

     दरम्यान आज झालेल्या निकाल श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना धक्का मानला जात आहे.

तसेच  ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, आ.लहू कानडे व करण ससाणे, माऊली मुरकुटे यांच्यासह काँग्रेस पक्षाला दिलासा देणारा आहे.

---/----


श्रेय माऊलींना...

दैनिक राष्ट्र सह्याद्रीशी बोलताना डॉ. वंदना मुरकुटे म्हणाल्या, सर्व प्रस्थापितांच्या विरोधात लढा जिंकणे सोपे नव्हते. हे सर्व श्रेय माऊलींचे (ज्ञानेशवर मुरकुटे) यांचे आहे. त्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. लहू कानडे यांचे खूप सहकार्य मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या