ज्योतीबा फुलेंमुळे समतेची शिकवण : महसूलमंत्री ना.थोरात


संगमनेर ( प्रतिनिधी ) 

थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित, वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडून समतेसाठी लढा दिला. त्यांचे जिवनकार्य हे सर्व भारतीयांना सदैव प्रेरणादायी आहे. उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करुन पुरोगामी विचार देणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे देशाला समतेची शिकवण मिळाली असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री नामदार थोरात यांनी केले आहे.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समवेत आ.डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे,विश्वासराव मुर्तडक,दिलीपराव पुंड,धनंजय डाके,किशोर टोकसे, राजेश वाकचौरे,शैलेश कलंत्री,नितीन अभंग,गजेंद्र अभंग,बाळासाहेब पवार आदि उपस्थित होते.

यावेळी ना.थोरात म्हणाले कि, महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक महाराष्ट्राचे जनक मानले जात असून समानता व स्त्री शिक्षणासाठी त्यांनी खुप मोठे कार्य केले. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे महत्वाचे साधन असून शिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांनी तत्कालीन जुन्या परंपरा मोडीत काढून सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देवून पहिल्या स्त्री शिक्षीका बनविले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून ब्रिटीशांपुढे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्यां महात्मा ज्योतीबा फुले यांनी समतेचा पुरोगामी विचार देशाला दिला. अंधश्रध्दा निर्मुलन, सतीची चालबंदी, केशवपण यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सामाजिक विषमता नष्ट करुन समाजात समता निर्माण करण्याचे मोठे काम त्यांनी केले असून प्रतिगामी शक्तींचे विचार मोडून काढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे समतेचे पुरोगामी विचार तरुणांनी आचारणात आणले पाहिजे असे ही ते यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या