...अन्यथा असंतोषाचा उद्रेक होईल

एसटी कर्मचार्‍यांसाठी राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


मुंबई

एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी-कामगारांचा राज्यात बेमुदत संप सुरू आहे. आता हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे विलीनीकरणाबाबत राज्य शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने कर्मचारी संघर्ष करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका. अन्यथा असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा दिला आहे.

राज ठाकरे आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच, 'एसटी महामंडळाला राज्य शासनात विलिन करा' ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांमधील काम ठप्प आहे. ज्या आगारांमध्ये काम सुरू आहे, तिथेही असंतोष खदखदत आहेच. अशा स्थितीत, ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना 'सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल' असा नोटीसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टींमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे, असे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. आज गरज आहे ती एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची. 'एसटी कर्मचारी कामगार जगला, तरच एसटी जगेल' हे भान बाळगण्याची, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या