ज्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते बोलले, अजित पवारांचा नारायण राणेंना टोला

 



 पुणे: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा दावा केला आहे. राणेंच्या या दाव्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हवाच काढून घेतली आहे. त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले. आमचं सरकार चालणार आहे हे आमच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केलंच आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हा दावा केला. ज्या दिवसापासून सरकार आलंय तेव्हापासून सरकार पडणार असल्याचं ऐकत आहे. पण सरकार चाललंय ना बाबा. कोण काय बोलतंय हे तुम्ही कोट करून सांगता. पण त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला जे योग्य वाटतं ते ते बोलत आहेत. आमच्यातील अनेक मान्यवरांनी सरकार चाललं आहे. सरकारला काहीही धोका नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे, असं पवार यांनी सांगितलं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या