आर्यन ड्रग्ज विक्री रॅकेटमध्ये सहभागी नव्हता

उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण; वानखेडेंच्या अडचणीत वाढ 


मुंबई 

मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. आर्यन खान ड्रग्ज विक्री रॅकेटमध्ये सहभागीअसल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर जोरदार हल्लाबोल करत केंद्राने आतातरी पाठराखण करू नये असा सल्ला दिला. 

“आर्यन आणि अरबाज मर्चंट क्रूझवर स्वतंत्रपणे प्रवास करत होते, त्यांनी ड्रग्ज घेण्याची कोणतीही योजना आखल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच आर्यन खानच्या व्हाट्सअ‍ॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचे षडयंत्र रचल्याचे दिसून येत नाही”, अशी माहिती जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. 

“सर्व आरोपींनी समान हेतूने बेकायदेशीर कृत्य करण्यास सहमती दर्शविली हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ऑन-रेकॉर्ड सकारात्मक पुरावा न्यायालयासमोर सादर केला गेला नाही.” असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. “अर्जदारांविरुद्ध कट रचल्याचा खटला सिद्ध करता यावा, यासाठी पुराव्याच्या स्वरूपात मूलभूत सामग्री असली पाहिजे, याबाबत न्यायालय संवेदनशील आहे.”, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. 

खानचे अपहरण खंडणीसाठीच : ना. मलिक 

आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता. हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते हे सांगत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे. समीर वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेतील. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे, अशी उधळपट्टी थांबली पाहिजे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या