एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी

शासन दरबारी पाठपुरावा करणार : राज्यमंत्री भरणे


इंदापूर  प्रतिनिधी

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांप्रमाणेच सेवा जेष्ठता निश्चित करून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी रविवारी ( दि.४ ) मध्यरात्री पासून एसटी कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाचा मार्ग अवलंबिला आहे. इंदापूर बस आगार येथे चालू असलेल्या आंदोलन ठिकाणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या सदरील मागण्या सरकार दरबारी पोचवण्याचे आश्वासित केले आहे.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,  कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. शेवटी ज्याचे जळते त्यालाच कळते. त्यामध्ये तुमची चूक नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे काम धोकादायक असते. रात्रंदिवस काम करावे लागते. त्यामुळे सदरील मागण्यांविषयी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी बोलून बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडतो. कर्मचाऱ्यांच्या मागण्या चुकीच्या नाहीत. कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने अडचणी आहेत. परंतु अडचणीतून मार्ग काढला पाहिजे. आता काहीशी परिस्थिती सुधारत आहे. मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करेन. लहान किंवा मोठ्या भावाप्रमाणे सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही राज्यमंत्री भरणेंनी यावेळी दिली.

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना याप्रसंगी सांगितले की, आत्तापर्यंत जवळपास पस्तीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. याची दखल आजतागायत कोणी घेतली. त्यामुळे जोपर्यंत एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप चालूच ठेऊ. यावेळी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांकडे निवेदन दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या