आळंदी :
इंद्रायणी नदी पात्रात हिरवागार वाढलेल्या जलपर्णीमुळे नदी काठच्या गावांमध्ये डासांची उत्पत्ती वाढ झाली आहे.नदीपात्रात जलपर्णी वाढल्याने पाण्याला उग्रवास येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांच्या प्रादुर्भावाने लहान मुलांना ताप, खोकला, श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत.
इंद्रायणी नदीवर मरकळ-चऱ्होली, केळगाव, डुडूळगाव, मोशी, चिंबळी येथील कोल्हापुरी बंधारा जलपर्णीने व्यापले असल्याने नदीपात्राने जणू काही हिरवेगार गालिचा पांघराला आहे का, असा भास निर्माण होत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कंपन्यांमधून विनाप्रक्रिया दूषित व रसनायन मिश्रीत पाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात असल्याने पाण्याला उग्रवास येत असून संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने व्यापले आहे. नदीपात्रात वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी व ती नामशेष करण्याबाबत महापालिका प्रशासन सर्वच स्तरावर नापास झाल्याचे दिसून येत आहे.
परिसरातील अनेक पर्यावरणप्रेमी संस्था “जलपर्णी मुक्त’ अभियान राबवून नदीपात्र मोकळे करतात. मात्र, काही दिवस जाताच परत जलपर्णी आपले उग्र रूप धारण करून विळखा घालते. जलपर्णी पसरल्याने नदीपात्रातील जलचर प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. नदी प्रदूषण करणारे घटक यांच्यावर कारवाईची गरज आहे. आळंदीकर नागरिक शुद्ध पिण्याचे पाण्या पासून वंचित असुन येणारे भाविक व नागरीकात नाराजीचा सुर निर्माण झाला आहे.
0 Comments