दाभोलकरांच्या 'अंनिस'मध्ये फूट

 



हमीद-मुक्ता गटाने ७ कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतला : 
अविनाश पाटील यांचा आरोप

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी संघटनेचा ७ कोटी रुपयांचा निधी असलेला ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना केला आहे. तसेच हमीद-मुक्ता गटातील ५-१० लोक संघटनेच्या कोणत्याही पदावर नसल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही एन. डी. पाटील यांच्या निधनाच्या दुःखातून सावरत होतो त्यामुळे नव्या अध्यक्षांच्या निवडीचा संबंध नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी करत आपली भूमिका मांडली आहे.

अविनाश पाटील म्हणाले, एन. डी. पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यानंतरच्या दुःखातून आम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघटना अजून सावरत होतो. असे असताना आमच्या संघटनेने रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या जागेवर नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्न येत नाही. असा कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही. येत्या जून २०२२ मध्ये विद्यमान राज्य कार्यकारिणीचा कालावधी संपत आहे. त्यानंतर संघटनेच्या नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल. सरोज पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड हमीद- मुक्ता दाभोलकर स्थापित गटाने केली आहे. या निवडीबद्दल सरोज पाटील यांचे मी अभिनंदन करतो.

हमीद-मुक्ता गटाचा डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना जे काम करते आहे, त्या कामाचे गपचूप श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे ही या गटाची कार्य पद्धती आहे. या गटात असणारे ५-१० लोक समितीच्या कोणत्याही पदावर नाहीत, पण ते ४ ते ६ महिन्यांतून एखादा कार्यक्रम समितीच्या नावाने घेऊन समिती विरोधात समांतर कार्यपद्धती अवलंबत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे नुकतीच सरोज पाटील यांची महाराष्ट्र अंनिसच्या अध्यक्षा म्हणून या गटाने निवड जाहीर करणे आहे. 

समितीच्या कामाशी संबंध नसताना अशी निवड जाहीर करण्याचा हा खोडसाळपणा म्हणजे सार्वजनिक जीवनात संभम निर्माण करुन फसवणूक करणे आहे. नागरिक, प्रसार माध्यमे आणि समविचारी संस्था, संघटना, कार्यकर्ते यांची ही दिशाभूल आहे. वारसा हक्क आणि घराणेशाहीने एकूणच पुरोगामी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे. संत, समाज सुधारकांची जाज्वल्य परंपरा असलेला महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार वारसा घेऊन आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या ६० वर्षातील सर्वांगिण विकासाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या परिवर्तनशील चळवळींनी आपल्या मर्यादा ओलांडण्याचा देखील विचार करायला हवा,  असे अविनाश पाटील म्हटले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेची स्थापना शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने ९ ऑगस्ट १९८९ रोजी झाली. १९८९ ते २००९ पर्यंत डॉ नरेंद्र दाभोलकर हे समितीचे कार्याध्यक्ष होते. ते हयात असताना २०१० साली अविनाश पाटील म्हणजे माझी कार्याध्यक्ष म्हणून‌ सर्वानुमते निवड करण्यात आली होती. त्यानंतर सलग जवळपास एक तप, १२ वर्षे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आलो आहे. १९८९ पासून ते‌ मृत्यूपर्यंतच्या १७ जानेवारी २०२२ पर्यंत एन. डी. पाटील हेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष होते, अशी माहिती अविनाश पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र अंनिसच्या आर्थिक व्यवहारांसाठी १९९३ साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र नावाने सातारा येथे विश्वस्त संस्था स्थापन केली गेली होती. प्रतापराव पवार हे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर हे संस्थापक कार्याध्यक्ष होते, त्याच कार्याध्यक्ष पदावर डॉक्टरांच्या खुनानंतर लगेच आठवड्यात भावनिक आवाहनाने त्यांच्या पत्नी, डॉ शैला दाभोलकर यांच्याकडे‌ सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी सतत २५ वर्षे देणग्या व जाहिरातींच्या माध्यमातून अत्यंत चिकाटीने, कष्टाने मिळवलेली आणि काटकसर करून वाढविलेली साधारण ७ कोटी रक्कम करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त संस्थांमध्ये जमा आहे. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद- मुक्ता दाभोलकर कुटुंबियांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे आणि हमीद मुक्ता गटाने ७ कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतला आहे. त्या दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेने आर्थिक व्यवहारांसाठी विवेक जागर संस्था गठित करुन आपले कामकाज नियमितपणे सुरू ठेवले आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

तसे तर‌ अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी व्यापक प्रयत्न आणि संघटनांची गरज आहे. असे संघटनात्मक काम हमीद- मुक्ता गटाने नक्की करावे, त्यासाठी नवीन संघटना स्थापन करावी, पण आधीपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरून समांतर कार्यपद्धती अवलंबून नये. प्रत्यक्षात स्वतः काहीही काम न करता, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करुन, संघटीत कार्यकर्त्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये. संघटना म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते समर्पित भावनेने काम करीत आहेत. खरे तर समाज परिवर्तनाच्या चळवळीत कार्यकर्त्यांना देण्यासारखे फार काही नसते, त्यातल्या योगदानाचे श्रेय हेच एकमेव असते. त्यातून त्यांना ऊर्जा मिळते. असे संघटीत कार्यकर्त्यांच्या कामाचे ‘श्रेयस’ कोणत्याही प्रकारे हिरावले जाऊ शकत नाही,” असंही त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं. अविनाश पाटील यांच्या या आरोपांवर डॉ. हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर दोघांशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

---------------------------

हमीद-मुक्ता गट घराणेशाही जोपासणारा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ३० वर्षांच्या संघटनात्मक कार्य‌ पद्धतीतून पुढे आलेली लोकशाही, विकेंद्रितता आणि सामूहिक निर्णय प्रकिया अनेकदा संवाद करून देखील हमीद- मुक्ता गटाला मान्य झालेली नाही. त्यामुळे घराणेशाही आणि वारसा हक्क जोपासणारा हा गट समितीपासून स्वतंत्र झाला आहे. या गटाने संघटनेने सलग जवळपास ३० वर्षे चालविलेले समितीचे मुखपत्र राहीलेले अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक ताब्यात घेतले. त्यानंतर संघटनेने ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ नावाचे नवे मुखपत्र सुरू केले. आतापर्यंत या पत्रिकेचे ५ हजारांहून अधिक वाचक सभासद झाले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या