कोर्लई गावाच्या दिशेने निघाले असतानाच संजय राऊतांचा इशारा.........


भाजपा नेते किरीट सोमय्या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या कोर्लई येथील जागेवरील १९ बंगल्यांचा शोध घेण्यासाठी गावात दाखल होणार आहेत. यामुळे आज पुन्हा एकदा शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यात संघर्ष पहायला मिळू शकतो. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांचा वेडसर असा उल्लेख करत ते जेलमध्ये जातील असं मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

“कोण आहेत किरीट सोमय्या? वेडा माणूस इकडे तिकडे फिरत आहेत. ते जेलमध्ये जाणार असून त्याचा रस्ता शोधत आहेत. ते इथे तिथे पळत आहेत. येथील जनता त्यांची धिंड काढतील. वेट अँण्ड वॉच…ते कुठे जातात, बंगले शोधतात ही काय बातमी आहे का? बंगले कुठे आहेत दाखवा आम्ही सांगितलं आहे. त्यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. ते वेडे झाले आहेत. त्यांची बेनामी संपत्ती कुठे असेल तर ती स्वप्नात दिसत असेल,” असं संजय राऊत म्हणाले.

“ज्या किरीट सोमय्यांनी तुमच्यावरही मनी लाँडरिंगचे आरोप केले होते त्यांच्याविषयी काय मत आहे?”, नारायण राणे म्हणाले…

किरीट सोमय्या कोर्लई गावासाठी रवाना, शिवसैनिकांसोबत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता; म्हणाले “प्रशासनाने रोखलं तर…”

“यावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. तेथील जमिनीवर एकही बांधकाम, बंगला नाही. यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. भाजपाच्या लोकांना बहुतेक भुताटकीने झपाटलं आहे,” असंही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यासंबंधी हे लोक बोलत नाहीत. पण अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोर्टबाज्या, पत्रकबाज्या करत होते”.

“अलिबागचे जावई आहात जावयासारखे या; उन्माद करु नका अन्यथा…,” किरीट सोमय्यांना शिवसेनेचा इशारा

“अन्वय नाईकसारखा एक मराठी माणूस, उद्योजक यांनी भाजपाच्या दबावामुळे आत्महत्या केली, कारण हे लोक अर्णब गोस्वामीला वाचवत होते. किरीट सोमय्यांनीदेखील अन्वय नाईक यांना अर्णब गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, बिल पाठवायचं नाही यासाठी धमकावल्याची माझ्याकडे माहिती आहे. दोन वेळा बोलावून त्यांना धमकावण्यात आलं. त्यानंतर ही आत्महत्या झाली आहे. भाजपाच्या लोकांनीच त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केली.

“भाजपाचे लोक महाराष्ट्र आणि मुंईबतून मराठी उद्योजकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व अन्वय नाईकचे हत्यारे असून आणि त्यांच्यातील एक हत्यारा त्या जमिनीवर चालला आहे,” असं संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बाप आणि बेटे जेलमध्ये जातील असा इशारा दिला. तसंच किरीट सोमय्या हे काही नेल्सन मंडेला नसून देशातील सर्वात मोठा चोर, लफंगा, डाकू असल्याचा उल्लेख केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या