ऊसतोड कामगार महिलेचा शेतात जळून मृत्यू

 


लातूरः
ऊस तोड कामगार उसाची तोडणी करत असताना ऊसाच्या शेतात अचानक लागलेल्या आगीत ऊस तोड कामगार महिला जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे.

तालुक्यातील सेलू शिवारात दिलीप गोविंद सांडुर यांच्या ऊसाची तोडणी सुरू आहे. त्यासाठी रेनापुर सहकारी साखर कारखान्याची ऊस तोड कामगारांची टोळी दिलीप सांडुर यांच्या शेतात ऊस तोडीसाठी दाखल झाली. ऊस तोडणीचे काम सुरू असताना उसाच्या फाडला अचानक आग लागली. उभा ऊस आणि वाळलेली पाचट यामुळे डोळ्याचे पाते लावते ना लावते तोच आगीने रौद्ररूप धारण केले. एकच धावपळ सुरू झाली. पण बघताबघता या आगीत ऊस तोड कामगार महिला जळून खाक झाली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी, ऊसतोड कामगारानी आग विझविण्याचा प्रयत्न केला पण एक एकर उसाची राख झाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालच पण एका ऊसतोड कामगार महिलेचा यात बळी गेला. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

या आगीत मयत झालेल्या ४० वर्षीय महिलेचे नाव लक्ष्मीबाई उत्तम कांबळे असून ती जळकोट तालुक्यातील वेळापूर येथील रहिवासी होती. आगीत भाजल्यानंतर त्यांना शेतकरी आणि ऊसतोड कामगारांनी तात्काळ लातूरच्या दासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या