ऐतिहासिक आदिल दरवाजा उजळणार

दिवसा आणि रात्री  असे असेल चित्र

 औरंगाबाद | शहरातील सुभेदारी विश्रामगृहाजवळील  ऐतिहासिक आदिल दरवाजा  आणि त्याला लागून असलेल्या तटबंदीचे नूतनीकरण करण्याचे काम जिल्हा प्रशासनातर्फे  हाती घेण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून या दरवाजाची स्थिती अत्यंत वाईट झाली होती. मात्र आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पुढाकारातून दरवाजाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तब्बल 2 कोटी 25 लाख रुपये खर्च करून दरवाजाचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण केले जाणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

किलेअर्कची तटबंदी असेही नाव

शहरात कोणत्याही राजकीय नेत्यांचे दौरे, बैठका होण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सुभेदारी विश्रामगृह. या विश्रामगृहाकडे जाताना जिल्हाधिकाऱ्यांना निवासस्थानाला लागून मोठी तटबंदी आहे. त्याला किलेअर्कची तटबंदीही म्हटले जाते. शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाचे प्रवेशद्वारे म्हणजे मीर आदिल दरवाजा.  मागील अनेक दशकांमध्ये या दरवाजासह तटबंदीकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे हा दरवाजा मोडकळीस आला आहे. आता तटबंदीचीही पडझड सुरु झाली आहे.

नूतनीकरणाचा प्लॅन काय?

2 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करून या दरवाजा आणि तटबंदीचे नूतनीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दरवाजा आणि तटबंदीची डागडुजी करून तिला गतवैभव प्राप्त करून दिले जाईल. हे काम लातूर येथील साईप्रम कंस्ट्रक्शन्सला 1 कोटी 51 लाख रुपयांत देण्यात आले आहे. त्यानंतर सुशोभिकरणासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली असून वास्तुविशारद प्रदीप देशपांडे हे काम पाहत आहेत. येथील तटबंदीला लागून असलेल्या खुल्या जागेचा वापर सामाजिक उपक्रमांसाठी करता यावा, म्हणून एक स्टेज उभारण्यात येईल. ओपन थिएटर, विविध शिबिरे, कार्यशाळा, हेरिटेज वॉक, परेड, पोलीस बँड, एनसीसी परेड, शैक्षणिक मेळावे आदी उपक्रम येथे घेता येतील, अशी योजना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या