औरंगाबादमध्ये १०० एसटी कर्मचाऱ्यांवर केली कारवाई


औरंगाबादः
एसटीचे शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी चार महिन्यांपासून अनेक कर्मचारी संपावर आहेत. या संपावर जाणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर एसटीच्या शिस्त व आवेदन पद्धतीनुसार कारवाई करण्यात आलेली आहे. औरंगाबाद विभागात आतापर्यंत १०० संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. चिकलठाणा कार्यशाळेत आतापर्यंत १८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून एसटीच्या विलिनीकरणासाठी संप पुकारण्यात आले होते. महिनाभर कडक चाललेल्या संपानंतर एसटी प्रशासनाच्या औरंगाबाद विभागाकडून एकुण १५२ कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आलेल्या होत्या. महामंडळाने संप सोडून कामावर येण्याचे आवाहन केल्यानंतर यातील ५२ कर्मचारी परत कामावर आले होते. तर १०० च्या जवळपास कर्मचाऱ्यांना या नोटीसा पाठविण्यात आलेल्या होत्या. त्या पाठविलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. विहित मुदतीत जबाब न आल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांवर टप्प्याने कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात आतापर्यंत १०० एसटीच्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेले आहेत.


चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत कामावर गैरहजर असलेल्या संपात सहभागी असलेल्या एकूण २४ जणांना नोटीसा देण्यात आलेल्या होत्या. त्या कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आलेली आहे. आतापर्यंत चिकलठाणा कार्यशाळेतील १८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आगामी काही दिवसांत उर्वरित ६ जणांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याचे संकेत एसटी प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या